पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 06:40 IST2025-05-05T06:39:57+5:302025-05-05T06:40:31+5:30
ऐन वैशाख वणव्यात कपातीची टांगती तलवार

पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील जलसाठा २३ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मात्र, पाणी कपातीचा विचार नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. १५ मेपर्यंत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे जल अभियंता विभागाने म्हटले आहे.
मुंबईकरांना दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभरासाठी सातही धरणांत मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा ४,११,३५५ दशलक्ष लिटर साठा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव साठा देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. भातसा आणि अप्पर वैतरणातून हा साठा घेण्यात येईल.
तीन वर्षांतील धरणस्थिती
वर्ष पाणीसाठा (दक्षलक्ष लि. ) टक्के
२०२५ ३३३७१८ २३.०६
२०२४ २५८९८८ १७.८९
२०२३ ३३९२५९ २३.४४
धरणांतील ४ मे रोजीचा जलसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा ४३९६१
मोडक सागर ३५७७७
तानसा २७,७५०
मध्य वैतरणा ५०३२५
भातसा १६३५१२
विहार ९५३३
तुळशी २८६१