पराभूत झालेल्या पक्षांनी आत्मपरीक्षण करावे, निवडून आलेले आमचे नगरसेवक एकनिष्ठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:43 IST2026-01-18T11:43:34+5:302026-01-18T11:43:34+5:30
एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांचे उद्गार

पराभूत झालेल्या पक्षांनी आत्मपरीक्षण करावे, निवडून आलेले आमचे नगरसेवक एकनिष्ठ
मुंबई : महाराष्ट्रातील विविध महापालिकांमध्ये एमआयएमच्या १२५ उमेदवारांना नगरसेवक म्हणून निवडल्याबद्दल त्या पक्षाचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी जनतेचे आभार मानत पराभूत झालेल्या पक्षांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला. शनिवारी हैद्राबाद येथे पत्रकार परिषदेत ओवेसी यांनी सांगितले की, एमआयएमच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आमचा पक्ष भाजपची 'बी टीम' असल्याच्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही. असे आरोप करणारे मतदारांचा अपमान करत आहेत. आम्हाला हिणवणाऱ्यांचा मतदार पराभव करतील व एमआयएम आणखी बळकट होईल.
व एमआयएम आणखी बळकट होईल, विजयाचे अनेक पिता असतात, पराभवाचे नाहीत, अशी इंग्रजीत एक म्हण आहे. आपण का पराभूत झालो हे संबंधित पक्षांनी जनतेला सांगायला हवे. माझ्या मते मतदार याद्या योग्य आहेत, असेही त्यांनी सांगितले. आता तेलंगणामध्ये महापालिका निवडणुका लढण्यासाठी आम्ही सज्ज होत आहे. त्याकरिता पक्षाने उमेदवार निवडीसाठी प्रक्रियाही सुरू केली आहे.
हरिद्वारमधील हरी की पौडी येथे बिगरहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घातल्याच्या वृत्तांबाबत विचारल्यावर ओवेसी म्हणाले. की, अशा प्रकारची कृत्ये संविधानविरोधी आहेत. हा अस्पृश्यतेचाच एक प्रकार आहे. त्यामुळे समानतेच्या अधिकाराचेही उल्लंघन होत आहे
'इतरांविषयी मला काहीही माहिती नाही'
उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे राज ठाकरे हे महापालिका निवडणुका एकत्रितरीत्या लढले. त्याबाबत ओवेसी म्हणाले की, महाराष्ट्रातील महापालिकांचा निकाल सगळ्यांसमोर आहे.
उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पालिका निवडणुकीत जिथे जिंकले तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे. आमचा पक्ष जिंकला, याचा मला आनंद आहे. इतरांविषयी मला काही माहिती नाही. महाराष्ट्राचे प्रश्न समजून घेऊन ते हिरिरिने सरकारकडे मांडण्यासाठी आमचा पक्ष आघाडीवर राहिल. जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो असेही त्यांनी सांगितले.