Sanjay Raut News: २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही यंत्रणेमध्ये हेराफेरी करण्यासाठी तयार केलेला मॅच फिक्सिंगचा आराखडा होता. आता हेच प्रकार बिहारमध्येही होणार आहे. भाजपला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका लेखाच्या माध्यमातून केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. भाजपा नेत्यांनी आक्रमक होत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले आहे. राहुल गांधी असामान्य नेते आहेत, अशी पुष्टीही संजय राऊतांनी जोडली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी देशभरातील वृत्तपत्रांमध्ये मुलाखती देऊन ज्या भावना मांडल्या आहेत , त्या त्यांनी आधीही मांडल्या आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊच शकत नाही. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा आम्ही जिंकल्या होत्या, असे काय झालं की इतका मोठा एकतर्फी विजय तुम्हाला मिळावा. लाडकी बहीण या आवरणाखाली तुम्ही ही निवडणूक हायजॅक केली, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
राहुल गांधी असामान्य नेते, संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती
मी असे म्हणतो की, विधानसभेची निवडणूक झालीच नाही. राहुल गांधी यांनी जे पाच मुद्दे उपस्थित केले, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर केले. त्याची उत्तरे भाजपाकडे नाहीत. देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची वकिली करत आहेत. मोदी, शाह, फडणवीस यांनी लोकशाही कशी हायजॅक केली, लोकशाही मूल्य कशी पायदळी उडवली, निवडणूक आयोगापासून अनेक संस्था कशा अस्वस्थ करून सोडलेल्या आहेत, आता भाजपाचे लोक म्हणत आहेत की, राहुल गांधी यांची विधाने खोटी आहेत. या देशांमध्ये खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार हा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी यांना दिला पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी केली. राहुल गांधी असामान्य नेते आहेत, ते संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. त्यांनी जी विधाने केलेली आहे, त्यालाही तेवढेच महत्त्व आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखांमुळे भाजपाचा तिळपापड झालेला आहे. राहुल गांधी यांचा लेख छापून आल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा पडला आहे. देशातील जनतेला कळले आहे की, नरेंद्र मोदी आणि कंपनी कशा पद्धतीने निवडणुका जिंकत आहेत. निवडणूक प्रचारामध्ये भाजपा सैनिकांचा गणवेशाचा गैरवापर करत आहे, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला.