लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बारचा परवाना परत करण्यात आला आहे. जर सर्व काही कायदेशीर होते, तर परवाना परत करण्याची काय गरज होती? असा सवाल उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी शुक्रवारी केला. या कृतीतून बारमध्ये गैरकृत्य घडत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली.
आ. परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन राज्यमंत्री कदम यांच्याविरोधातील पुरावे दिले होते. त्यानंतर कदम यांनी बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला आहे. त्यांच्याकडून कायद्याने गुन्हा घडला आहे. परवाना परत केल्यामुळे त्यांची यातून सुटका होणार नाही, असेही आ. परब यांनी सांगितले.