वेतन बुडण्याच्या भीतीने शिक्षकांना शाळेबाहेर उभे राहण्याची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 01:58 AM2020-06-18T01:58:46+5:302020-06-18T01:58:55+5:30
महिला शिक्षकांची दगदग: ट्रेनमध्येही प्रवेश न मिळाल्याने प्रवासाचेही हाल
![Teachers punished for standing outside school for fear of losing their salaries! | वेतन बुडण्याच्या भीतीने शिक्षकांना शाळेबाहेर उभे राहण्याची शिक्षा! Teachers punished for standing outside school for fear of losing their salaries! | वेतन बुडण्याच्या भीतीने शिक्षकांना शाळेबाहेर उभे राहण्याची शिक्षा!](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/teacher_20180362870.jpg)
वेतन बुडण्याच्या भीतीने शिक्षकांना शाळेबाहेर उभे राहण्याची शिक्षा!
मुंबई : शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट करत पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहण्याचे एसएमएस पाठवले. शाळेत हजर नाही झालात तर विनावेतन रजा होईल. त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, अशा मेसेजमुळे घाबरलेले शिक्षक बुधवारी शाळांमध्ये उपस्थित राहिले. मात्र पालिकेच्या ज्या शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरात आहेत तेथे शिक्षकांना दिवसभर सेंटरबाहेर तिष्ठत उभे राहावे लागल्याची माहिती अनेक शिक्षकांनी दिली.
त्याचप्रमाणे जे शिक्षक विरार- पालघर, वसईवरून येणारे आहेत त्यांनाही लोकल ट्रेनमध्ये प्रवेश न मिळाल्याने रेल्वेस्थानकाबाहेर तासन् तास बसगाड्यांची वाट बघत राहण्याची वेळ आली. यामध्ये महिला शिक्षकांचे हाल झालेच. मात्र त्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असे प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत. वेतन कापण्याच्या भीतीने शिक्षकांचे झालेले हाल पाहून पुन्हा एकदा जोपर्यंत शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत शिक्षकांना शाळेत न बोलावता वर्क फ्रॉम होमच करू द्यावे अशी मागणी जोर पकडू लागली आहे.
जुलैपासून शाळा सुरू होणार असली तरी तयारीसाठी शाळेत सर्व मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दररोज शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
जे शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहणार नाहीत त्यांची आॅडिट नोट काढली जाईल व न येणाºया प्रत्येक दिवसाची विनावेतन रजा होईल; त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही असे निर्देश मेसेजद्वारे पालिका शिक्षण विभागाच्या शिक्षकांना पोहोचले असल्याने वेतन कपातीच्या भीतीने शिक्षकांनी शाळांमध्ये उपस्थित राहण्याची धडपड केली. शाळा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरात असताना शिक्षकांना इतर शाळांत, वॉर्डात बसण्याचा अट्टहास का, असा सवाल शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केला आहे.
कर्मचारी उपस्थितीचा नियम पाळा
वेतन कापले जाण्याच्या भीतीने काही शिक्षक गावाहून येण्यासाठी १० ते १५ हजार खर्च करत खासगी वाहने करून येण्याची धडपड करत आहेत. तर विरार, बदलापूर, कल्याण, वसई, पालघर येथून येण्यासाठी ५०० ते १०००
रु पये मोजावे लागत आहेत. या सगळ््यात महिला शिक्षकांचे विशेष हाल होत आहेत. शिक्षकांना शाळेत बोलवायचे तर सगळ््यांना एकदम बोलावण्याऐवजी कर्मचारी उपस्थितीचा नियम पाळा, अत्यावश्यक सेवेप्रमाणे शिक्षकांना ट्रेन प्रवासासाठी पासेस द्या तसेच क्वारंटाइन सेंटरबाहेरील सुरक्षेची जबाबदारी घ्या, अशी मागणी शिवनाथ दराडे यांनी केली आहे.