उत्तरपत्रिका तपासणीतील दोषींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:56 IST2018-11-01T00:56:12+5:302018-11-01T00:56:41+5:30

दोषी व्यक्तीकडूनच पुनर्मूल्यांकनासाठी आकारण्यात आलेले शुल्क वसूल करून ते विद्यार्थ्याला परत देण्यात यावे, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

Take action against the guilty in the post of papers | उत्तरपत्रिका तपासणीतील दोषींवर कारवाई करा

उत्तरपत्रिका तपासणीतील दोषींवर कारवाई करा

मुंबई : विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणी करणारे, तसेच पुनर्मूल्यांकनाच्या कामाशी निगडित प्राध्यापकांकडून व्यक्तींकडून वारंवार चुका होत असून, याचा फटका जर विद्यार्थ्यांना बसत असेल, तर अशा व्यक्तींकडून मग ती कुणीही असो, त्यांना मानधन न देता त्यांच्या पगारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. त्याबरोबर, त्या दोषी व्यक्तीकडूनच पुनर्मूल्यांकनासाठी आकारण्यात आलेले शुल्क वसूल करून ते विद्यार्थ्याला परत देण्यात यावे, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत. मुंबई विद्यापीठातील विविध प्रलंबित समस्यांसंदर्भात राज्यमंत्री वायकर यांनी बुधवारी विद्यापीठाच्या कालिना परिसरात बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू कुलकर्णी, कुलसचिव भिरुड, परीक्षा नियंत्रक घाटुळे, सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि इतर उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांमध्ये पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाºया विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांत वाढ झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. गुणांमध्ये वाढ झाली, तर निकाल विलंबाने लागत असल्याने, अनेक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधी, परदेशात जाण्याची, चांगली नोकरी मिळविण्याची संधी तर काहींनी कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्याचे सिनेट सदस्यांनी राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यानुसार परीक्षा झाल्यावर, तसेच पुनर्मूल्यांनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणारे आणि या कामाशी निगडित असलेली कोणतीही व्यक्ती दोषी आढळल्यास, तिच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. ही रक्कम त्यांच्या पगारातून वळती करण्यात यावी. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाºया तसेच त्याचे गुण वाढले असतील, तर त्या विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकनासाठी भरलेली रक्कम तत्काळ परत देण्यात यावी. दोषी व्यक्तींवर विद्यापीठ कायद्यानुसार तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही राज्यमंत्री यांनी या वेळी उपस्थित विद्यापीठातील अधिकाºयांना दिले.

‘परीक्षेच्या काळात परीक्षा विभाग दिवस-रात्र सुरू ठेवा’
ज्याप्रमाणे अधिवेशनाच्या काळात विधान भवन तसेच मंत्रालय दिवस-रात्र सुरू असते, अगदी त्याचप्रमाणे परीक्षेच्या काळात परीक्षा विभाग हा दिवस-रात्र सुरू ठेवण्यात यावा. या विभागात परीक्षा काळात त्या-त्या विषयातील प्राध्यापकांची तसेच अन्य अधिकाºयांची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देशही राज्यमंत्री यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत.

Web Title: Take action against the guilty in the post of papers