T20 World Cup 2021: भारत Vs पाकिस्तान सामन्याबाबत चंद्रकांत पाटलांनी मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 20:47 IST2021-10-20T20:45:38+5:302021-10-20T20:47:26+5:30
अफगाणिस्तानच्या घटनेनंतर काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. केंद्र सरकार कठोरपणे, कसोशीने सामना करत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

T20 World Cup 2021: भारत Vs पाकिस्तान सामन्याबाबत चंद्रकांत पाटलांनी मांडली स्पष्ट भूमिका
मुंबई - सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या लढतीकडे जगाचे लक्ष लागले आहे. सध्या दोन्ही देशातील संबंध तणावाचे आहेत, त्यामुळे हा सामना होऊच नये, अशी भूमिकाही काहीजणांनी घेतली आहे. त्यावरुन, अनेक मतमतांतर आहेत. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
अफगाणिस्तानच्या घटनेनंतर काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. केंद्र सरकार कठोरपणे, कसोशीने सामना करत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच, नुकतेच, बातमी आली, 6 दहशतावाद्यांना ठार करण्यात आलं. या सगळ्या घटनांना पाकिस्तानची फूस आहे, त्यामुळेच पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध, खेळाचे संबंध, सांस्कृतिक संबंध तोडले पाहिजे, अशी देशातील लोकांची भावना आहे. दुसऱ्या बाजूने हेही खरंय की, हा दहशतवाद तेथील सर्वसामान्य लोकांना मान्य असतो, किंवा त्यांच्यावतीने केला जातो, असे नाही. त्यामुळे, भावना महत्त्वाची असल्याने यासंदर्भात क्रीडा विभागाने योग्य तो निर्णय करावा, असेही पाटील यांनी म्हटलं.
सामन्याला विरोध, औवेसींनी मांडली भूमिका
एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याला विरोध केला आहे. यावेळी त्यांनी भारत सरकारला पूंछमध्ये 8 दिवसांत शहीद झालेल्या 9 जवानांची आठवण करून दिली. काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांच्या सुरु असलेल्या अभियानादरम्यान 9 जवानांना वीरमरण आलं. यावरुनही ओवीसींनी मोदी सरकारवर टीका केली. 8 दिवसांत आपल्या 9 जवान शहीद झाले आहेत अन् २४ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तानसोबत टी-२० मध्ये मॅच खेळणार आहे.
भारतासोबत क्रिकेटचे नाते वृद्धिंगत व्हावे
गेल्या अनेक दिवसांपासून भारतविरोधी विधाने केल्यानंतर अखेर पाकिस्तान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांना उपरती झाली आहे. दुबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर रमीझ राजा यांचा भारताबद्दलचा सूर बदललेला दिसला. बैठकीनंतर राजा म्हणाले की, ‘भारतासोबतचे क्रिकेटचे नाते अधिक वृद्धिंगत करण्याची गरज आहे. खेळात राजकारण नसायला हवे हे माझे मत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट अधिक समृद्ध करण्यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांमधले संबंध चांगले असायला हवेत. यातूनच आपण क्रिकेटमध्ये अधिक प्रगत होऊ शकतो’, असेही राजा यांनी म्हटलंय.