Join us  

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 12:26 PM

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव म्हणाले, विधानमंडळाला संविधानानं दिलेले अधिकार आहेत. लोकशाहीत परस्पर आदर करण्याची प्रथा आहे. भाजपनं देखील आम्हाला निलंबित केलं होतं. मी भाजप आणि कोर्टाला प्रश्न विचारतो की, राज्यपालांनी 12 विधानपरिषदेच्या आमदारांची यादी प्रलंबित ठेवली आहे. राज्यपालांनी 12 आमदारांना बाहेर ठेवलं आहे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आहे, असं जाधव म्हणाले.

दरम्यान, गेल्या जुलै महिन्यात विधानसभेत असभ्य व असंसदीय वर्तणूक केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची कारवाई केली. या निर्णयाला भाजप आमदार आशिष शेलार व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवरील सर्व युक्तिवाद गेल्या आठवड्यात संपले. न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयानं या प्रकरणात निकाल दिला. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रकरण नेमकं काय?

गेल्या वर्षी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू असताना राजदंड उचलणं, माईक खेचणं, त्याचबरोबर अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणं, शिवीगाळ करणं, अपशब्द वापरून गैरवर्तन करणं, यासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं.

कोण आहेत निलंबित आमदार?

आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)अभिमन्यू पवार (औसा)गिरीश महाजन (जामनेर)पराग अळवणी (विलेपार्ले)अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)संजय कुटे (जामोद, जळगाव)योगेश सागर (चारकोप)हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)जयकुमार रावल (सिंधखेड)राम सातपुते (माळशिरस)नारायण कुचे (बदनपूर, जालना)बंटी भांगडिया (चिमूर)

टॅग्स :भास्कर जाधवशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार