एसटीच्या वर्धापन दिन सोहळ्याचे कार्यक्रम रद्द; ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 07:28 IST2023-06-04T07:28:38+5:302023-06-04T07:28:50+5:30
एसटी महामंडळाकडून यशवंतराव चव्हाण केंद्रात वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

एसटीच्या वर्धापन दिन सोहळ्याचे कार्यक्रम रद्द; ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी यासंदर्भात प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
एसटी महामंडळाकडून यशवंतराव चव्हाण केंद्रात वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार होते. तर प्रत्येक एसटी बसस्थानकावर विविध उपक्रम राबवले जाणार होते. त्यात शनिवारी सर्व आगार व बसस्थानकावर सडा घालून रांगोळी काढून, झेंडूची फुले, आंब्याची पाने यांचे तोरण बांधणे, दर्शनी बाजूस केळीच्या खांबांनी स्वागत कमानी उभारणे, आगारातील प्रत्येक बस स्वच्छ धुऊन मार्गस्थ काढणे, ६ बाय ३ फुट आकाराचे कापडी फलक तयार करून बसस्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे, सर्व प्रवासी व कर्मचारी बांधवांना साखर, पेढे वाटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्याचा समावेश होता.