मसाल्यांना पुन्हा चुलीचा स्वाद; ऐन मिरचीच्या हंगामात सिलिंडरच्या टंचाईचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:59 IST2026-03-23T11:58:23+5:302026-03-23T11:59:01+5:30
लालबागमध्ये लाकूड-कोळशावर भाजणी

मसाल्यांना पुन्हा चुलीचा स्वाद; ऐन मिरचीच्या हंगामात सिलिंडरच्या टंचाईचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईत गॅस सिलिंडरची टंचाई झाली आहे. ऐन मिरची हंगामात लालबागमधील मसाला भाजणी आणि कुटण्याच्या व्यवसायाला अक्षरशः 'चुलीवर' आणले आहे. मात्र, या अडचणीतूनच पारंपरिक पद्धतीचा सुगंध पुन्हा दरवळू लागला आहे.
गॅसच्या वाढत्या खर्चामुळे आणि अनियमित पुरवठ्यामुळे येथील अनेक दुकानदारांनी लाकूड आणि दगडी कोळशाचा पर्याय स्वीकारला असून, त्यातून केवळ खर्चात बचतच नाही, तर मसाल्याला वेगळाच खमंग स्वाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
लालबागमधील दुकानांमध्ये रोज ४० किलो लाकूड, जवळपास ५० किलो दगडी कोळशाचा वापर होत आहे. लाकडाचा दर फक्त ३ ते ४ रुपये प्रति टन असल्याने हा पर्याय गॅसच्या तुलनेत खूपच किफायतशीर ठरत आहे.
पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुरेख मेळ
लाकडाचा पुरवठा आणि उपलब्धता याबाबत अनिश्चितता असल्याने हाही चिंतेचा विषय असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. गॅस टंचाईच्या संकटातून मार्ग काढताना लालबागमधील मसाला व्यावसायिकांनी पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुरेख मेळ घातला आहे. मात्र, ही तात्पुरती उपाययोजना कायमची ठरू नये, यासाठी गॅसपुरवठा सुरळीत होणे गरजेचे असल्याची मागणीही यावेळी व्यक्त केली जात आहे.
पंख्याच्या शेगडीचा वापर
पारंपरिक पद्धतीकडे वळताना आधुनिकतेची साथही घेतली आहे. धूर कमी यावा, परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी 'पंख्याची शेगडी' वापरली जात आहे. आधुनिक शेगडीमुळे धूर नियंत्रणात राहतो, तर ऊर्जाही आवश्यक प्रमाणामध्ये उपलब्ध होते, तसेच सुरक्षिततेचीही काळजी घेतली जात असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. या शेगडीसाठी सुमारे २२ हजार रुपये खर्च करण्यात आला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गॅस टंचाईमुळे तो महाग झाला असून, मिळायलाही उशीर होत असल्याने हा पर्याय निवडला, शिवाय लाकडावर भाजलेला मसाला अधिक चविष्ट होत असून, भाजणीचे दर मात्र आम्ही स्थिर ठेवले आहेत. - विजय चव्हाण, दुकानदार.