Join us  

'काही भक्त मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी कारवाई करणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 1:58 PM

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मोदींच्या भाषणानंतर ट्विट करुन, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे म्हटले.

मुंबई - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशवासीयांना संबोधित केले. यावेळी, आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार आहेत. मोदींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी देशातील सर्वच देवस्थानचे सोने ताब्यात घेण्यासंदर्भात विधाने केले होते. त्यावरुन, अनेकांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तर काही भाजपा नेत्यांनीही चव्हाण यांना टार्गेट केलं होत. याबाबत, पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मोदींच्या भाषणानंतर ट्विट करुन, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे म्हटले. तसेच, देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी एक उपायही सूचवला आहे. केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शनही केलं आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका केली. तसेच, काही भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांना टार्गेट करण्यात आलं. याबाबत, स्वत: चव्हाण यांनी ट्विटरवरुन खुलासा केला आहे. देशातील सर्वच धर्मांच्या देवस्थानातील सोन्याबद्दल मी दिलेल्या सूचनेचं, काही भक्त मीडियाने विपर्यास वृत्तांकन केलं. सन १९९९ मधील अटलबिहारी वायपेयी सरकारच्या काळातच, देशात सोने तारण योजना सुरु करण्यात आली आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. तर, मोदी सरकारने २०१५ मध्ये या योजनेचं नामांतर केलं आहे. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरानुसार, अनेक देवस्थानांनी त्यांचे सोने तारण ठेवले आहे. त्यामुळे, माझ्या वक्तव्याचा हेतुपूर्वक विपर्यास करणाऱ्यांवर मी कारवाई करणार असल्याचेही चव्हाण यांनी ट्विटरवरु सांगितले आहे.    

दरम्यान, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, देशाला स्वावलंबी करण्यासाठी काल मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला पॅकेजमधून दिलासा मिळेल, असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला. या पॅकेजची माहिती अर्थमंत्री उद्या देतील, असं मोदींनी म्हटलं होतं. आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देणार आहेत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती दोन-तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार असल्याचं अर्थ मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सन्याल यांनी सांगितलं.

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाणभाजपासोनंट्विटर