Join us  

महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा सरकार बनेल; संजय राऊतांनी सांगितलं 'ज्योतिष'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:15 AM

राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात 'सत्तासंघर्ष' सुरूच असल्याचे दिसते.

ठळक मुद्देराज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात 'सत्तासंघर्ष' सुरूच असल्याचे दिसते.सरकार स्थापन व्हायचं असेल तेव्हा होईल - संजय राऊतमहाराष्ट्राच्या कुंडलीत जे आहे ते होईल असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थापनेवरुन युतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे युतीत असलेली शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. याच दरम्यान महाराष्ट्राच्या कुंडलीत असेल तेव्हा सरकार बनेल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्राच्या कुंडलीत जे आहे ते होईल. सरकार स्थापन व्हायचं असेल तेव्हा होईल असं राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी राऊत यांना सरकार कधीपर्यंत स्थापन होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलं आहे.  

राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात 'सत्तासंघर्ष' सुरूच असल्याचे दिसते. मंगळवारी (29 ऑक्टोबर) भाजपा आणि शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली. शिवसेना आणि भाजपामध्ये 50-50 फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरला होता. मात्र, मुख्यमंत्री म्हणतात की, असे काही ठरलेच नव्हते. मग, लोकसभेवेळी असे काय ठरले होते, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

तसेच, भाजपाने ठरल्याप्रमाणे मागण्या मान्य कराव्यात. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने बैठक रद्द करण्यात आली. आज चर्चा झाली नाही, उद्याच काही निश्चित नाही. जर मुख्यमंत्री काही ठरलेच नाही, म्हणत असतील तर चर्चा करण्याचा काय फायदा, असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला. याशिवाय, शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान भाजपाचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली. याला उत्तर देताना संजय राऊत यांनी संजय काकडे नक्की भाजपाचे आहे का? असा सवाल उपस्थित केला. 

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊ, असे कधीच कबूल केले नव्हते. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असे काहीही होणार नाही, मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असे अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधली धूसफूस आणखी वाढली आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपादेवेंद्र फडणवीस