Join us  

मालाड-कांदिवलीत दुकाने बंद पाडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न भाजपाने हाणून पाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 4:03 PM

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी पाठबळ दिले असा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई- महाविकास आघाडीने लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचे राजकीय भांडवल करण्यासाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदचा  आज पुरेपूर फज्जा उडाला, लोकांनी हा बंद अयशस्वी केला असून पश्चिम उपनगरातील कांदिवली व मालाड येथील दुकानदारांना पोलिसांच्या मदतीने दमदाटी करून दुकाने बंद करण्यास सांगणाऱ्या शिवसेनेचा प्रयत्न मुंबई भाजपाचे प्रभारी व कांदिवली पूर्व  विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कडून हाणून पाडला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी पाठबळ दिले असा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात पूरग्रस्त शेतकरी,एसटी कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या करीत असताना लखीमपूर च्या नावाने नक्राश्रू ढाळणाऱ्या महाविकास आघाडीचा मनसुबा जनतेने ओळखला आणि आजचा बंद पूर्णपणे उधळून लावला. लोकांचा पाठींबा नसल्याने स्वतः पोलिस कार्यकर्त्यांच्या भूमिकेत रस्त्यावर उतरून बंद राबवत असल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी दिसले. गेली दोन वर्षे लॉकडाउनच्या नावाखाली महाराष्ट्र बंद ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सरकार पुरस्कृत बंद पुकारून आपला नाकर्तेपणा पुन्हा सिद्ध केला असा आरोप त्यांनी केला.

 पोलीस संरक्षणात अनेक ठिकाणी खासगी वाहने, बेस्ट बसची तोडफोड झाली. पोलीस बळाचा वापर करून केलेल्या या बंद दरम्यान सर्वसामान्यांचे झालेले नुकसान सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांच्या खिशातून भरून काढावे यासाठी आपण स्वतः उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमदार भातखळकर यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंद दरम्यान सरकार व पोलिसांच्या दादागिरी विरोधात रस्त्यावर उतरून  व्यापारी आणि दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यासाठी हिम्मत देणाऱ्या मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या   कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Bandhभाजपा