Join us  

'राणेंना भाजपात घेऊन पनवती लावून घेतली, आता राज ठाकरेंनाही घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 4:39 PM

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतल्याचे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देआशिष शेलार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतल्याचे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपाचं दिल्लीत पानीपत झालं आहे.

मुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. त्यातच आज भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मनसेप्रमुखराज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतल्याचे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना प्रश्न विचारला असता भाजपाने राज ठाकरेंना सोबत घ्यावं असे मत व्यक्त करत निशाणा साधला आहे. 

विनायक राऊत म्हणाले की, भाजपाचं दिल्लीत पानीपत झालं आहे. तसेच भाजपाचे खासदार नारायण राणे यांना पक्षात समावेश करुन भाजपाने पनवती लाऊन घेतली असल्याचे सांगत विनायक राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठीच्या प्रश्नावर राज ठाकरेंना भाजपाला सोबत घ्यायचं असे तर घ्यावे, कारण मागचा इतिहास पाहिला तर भाजपाची वाटचाल ही  झिरो पर्सेंटकडे चाललेली आहे, असं सांगत विनायक राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. 

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरुद्धच्या मनसेच्या मोर्चा आधीदेखील आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  प्रभादेवी येथील इंडिया बुल्स स्काय येथे राज ठाकरेंची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे भाजपाचे नेते राज ठाकरेंशी नेमक्या मुद्यांवर चर्चा करत आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

शिवसेना-भाजप युती तुटली असतानाच मनसेने अचानक हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या बदलत्या राजकीय स्थितीत हिंदुत्वाची कास धरणारा मनसे हा पक्ष आपला नवा मित्र होऊ शकतो, असे भाजपाला वाटत आहे. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत करत मनसे आणि भाजपा युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे आगामी 2022 मधील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपा एकत्र येऊन नवीन समीकरण तयार करणार का हे येणाऱ्या काळातच समोर येणार आहे.

टॅग्स :राज ठाकरेविनायक राऊत नारायण राणे भाजपामनसेशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारदिल्ली निवडणूक