Join us  

मुख्यमंत्री ठाकरेंना डोंबिवलीत फेरफटका मारा म्हणणाऱ्या राजू पाटलांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 3:23 PM

राजू पाटील यांच्या विधानावर आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. राजू पाटील यांच्या विधानावर आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे खासदार आणि नेते श्रीकांत शिंदे म्हणाले की, ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल, असं प्रत्युत्तर श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांना दिले आहे.

रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याण शीळ रसत्यावर वाहतुकीचा ताण आहे. वेळ मिळतोय तसा पॅचवर्क, डांबरीकरणाची कामे सुरु आहेत. या रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरणाचं काम सुरु आहे. कोरोनाचं संकट असूनसुद्धा या रस्त्याचं काम बंद पडले नाही. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे खड्डे होत आहे. मात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरु असून लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने लोकलसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहनसेवेच्या बस, रिक्षा, टॅक्सी, स्वत:ची दुचाकी, चारचाकी घेऊन नोकरदारवर्ग मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कर्जत, कसारा, भिवंडी, ठाणे व मीरा-भाईंदरपर्यंत प्रवास करीत आहे. तेथे जाण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना शीळ-कल्याण-भिवंडी या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच, या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला स्वतःला सावरणं गरजेचं, गांधी घराणं हेच त्यांचं आधार कार्ड- संजय राऊत

'...म्हणून लक्ष वळविण्यासाठी सचिन सावंत यांनी हा उद्योग केला असावा'; भाजपाचं काँग्रेसला प्रत्युत्तर

'शहरातील खड्ड्यांचा त्रास मलाही झाला'; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली उघड नाराजी

टॅग्स :राजू पाटीलमनसेराज ठाकरेउद्धव ठाकरेठाणेडोंबिवलीशिवसेनाश्रीकांत शिंदे