Join us  

प्रचाराची पातळी घसरली; ही तर बेबंद लोकशाही! शिवसेनेचा काँग्रेस-भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 7:23 AM

दोन-चार गुद्दे लगावले तर काही फरक पडत नाही, पण शेवटी अंदाधुंद गुद्देबाजीत मुद्देच नष्ट झाले तर तुमच्या लोकशाहीत निवडणुकांना अर्थ तो काय उरला? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे. 

मुंबई - मी काय केले आणि तुम्ही काय करीत आहात यापलीकडे प्रचार पुढे सरकत नाही. निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढवायच्या, निवडणुकीत काय बोलायचे व बोलू नये यासाठी निवडणूक आयोगाने सर्वच राजकारण्यांसाठी एखादा प्रशिक्षण वर्ग घेणे गरजेचे आहे. दोन-चार गुद्दे लगावले तर काही फरक पडत नाही, पण शेवटी अंदाधुंद गुद्देबाजीत मुद्देच नष्ट झाले तर तुमच्या लोकशाहीत निवडणुकांना अर्थ तो काय उरला? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने विचारला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूंनी अंदाधुंद ‘शब्दबार’ उडवले जात आहेत. निवडणूक प्रचाराच्या घसरलेल्या पातळीने तळ गाठला आहे. इतका अंदाधुंद प्रचार कधीच झाला नव्हता. लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे? असंही अग्रलेखातून सांगण्यात आलंय. 

सामना संपादकीयमधील महत्त्वाचे मुद्दे निवडणुकांच्या प्रचाराने कोणती पातळी गाठली आहे असे विचारण्याची सोय राहिलेली नाही. पातळी नव्हे तर तळ गाठला आहे. आम्ही काय करणार व आधी आम्ही काय दिवे लावले यापेक्षा समोरचा कसा दळभद्री व आम्ही मात्र कसे संतसज्जन आहोत अशा थाटात प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. 

अनुपम खेर हे पत्नी किरण खेर यांच्या प्रचारासाठी चंदिगडला गेले. तेथे खेर हे जोशपूर्ण भाषण करू लागताच तेथील एका दुकानदाराने 2014 चा भाजपचा जाहीरनामा काढून खेर यांच्या हातात ठेवला. 2014 साली आपण काही आश्वासने दिली होती, त्यातील किती पूर्ण झाली ते सांगा? असा प्रश्न म्हणे त्या दुकानदाराने खेर यांना विचारला. खरेतर अशा प्रकारांना मतदारांची जागरूकता म्हणावी की राजकीय कार्यकर्त्यांची चमकोगिरी? हे ज्याचे त्याने ठरवायचे. 

सध्याच्या जमान्यात व खास करून प्रचाराच्या धुरळ्यात कुणी कुणाची नाडी लोंबतेय हे पाहू नये. हमाम में सब नंगे होते है. चंदिगडच्या दुकानदाराने अनुपम खेरना विचारले, ‘मागच्या पाच वर्षांत काय केले?’ हाच प्रश्न देशातील जनता साठ वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसलाही जागोजाग विचारत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूंनी अंदाधुंद ‘शब्दबार’ उडवले जात आहेत. 

भाजपला बहुमत मिळेल. मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. हे भाकीत वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होताच मध्य प्रदेश सरकारने त्या ज्योतिष प्राध्यापकाला नोकरीवरून बडतर्फ केले. काँग्रेस राजवटीत भविष्य वर्तवणे हा गुन्हा ठरला आहे काय?  हीसुद्धा एक प्रकारची हुकूमशाहीच समजायला हवी. 

शिस्तभंगाच्या आरोपाखाली सीमा सुरक्षा दलातून बडतर्फ केलेला जवान तेजबहाद्दूर यास पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात समाजवादी पार्टी व मायावतीतर्फे उमेदवारी दिली जाते. हे महाशय दारूच्या धुंद नशेत पंतप्रधानांच्या विरोधात गरळ ओकतात. लोक तो ‘व्हिडीओ’ पाहतात, पुन्हा ज्या बेशिस्त तेजबहाद्दूरचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोग रद्द करते त्या तेजबहाद्दूरसाठी राजकीय पक्ष गळा काढताना दिसतात तेव्हा चिंता वाटते. 

एका बाजूला जवानांचे शौर्य आणि बलिदान तर दुसर्‍या बाजूला हा बेशिस्तपणा. शिवाय त्या बेशिस्तीला लोकशाहीच्या मखरात बसविण्यासाठी विरोधकांनी केलेला आटापिटा. हे सगळंच भयंकर आहे. 

एखाद्या सामान्य नागरिकालाही पंतप्रधानाच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे हे मान्य, पण तेजबहाद्दूरच्या बेबंदपणास इतके समर्थन कशासाठी? 

निवडणूक प्रचाराच्या घसरलेल्या पातळीने तळ गाठला आहे. इतका अंदाधुंद प्रचार कधीच झाला नव्हता. लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे? 

टॅग्स :लोकसभा निवडणूकउद्धव ठाकरेकाँग्रेसभाजपाशिवसेना