मुंबई - गेले काही दिवस राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यभर होत आहे. सर्वसामान्यांमध्ये या विषयावर चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात असले तरी शिंदेसेनेने यावर सावध पवित्रा घेतल्याचे दिसते.
शिंदेसेनेचे नेते, माजी खा. गजानन कीर्तिकर यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनीही एकत्र येत पूर्वीसारखी एकसंध शिवसेना व्हावी, असे मत व्यक्त केले, तर पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सावध पवित्रा घेत म्हटले की, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना जितके जवळून ओळखतात तेवढे अन्य कोणी ओळखत नसावे. राज यांना त्यांच्या स्वभावाचा अंदाज आहे.
राज ठाकरे उत्तरे घेतील!अनेक प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील आणि राज ठाकरे ती उत्तरे घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचबरोबर नेते एकनाथ शिंदे, उदय सामंत यांचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकी आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी घेतलेल्या आढाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी उद्धवसेनेसोबतच्या युतीबाबत एक शब्दही काढला नाही की चर्चा केली नाही, अशी माहिती मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.