Join us  

पवार-शहा भेटीवर संजय राऊतांनी सांगितलं 'राजकारण', चर्चा तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 11:49 AM

शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत.

ठळक मुद्देमाझं कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश नव्हता. सरकारमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचं काम उत्तम सुरू आहे

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. एका गुजराती वर्तमानपत्राने या तिघांमध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचे वृत्त दिले होते.  (That meeting did not take place, only the Pawar-Shah meeting was discussed, even the NCP denied it) त्यानंतर, राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या. भाजपा-राष्ट्रावादी पुन्हा म्हणणार का, अशीही चर्चा रंगली. यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत. पण, गुप्त काहीच राहत नसतं, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, सार्वजनिक होतात, असे संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. देशात महाराष्ट्राचं नाव खराब झालंय, या घटनांवरुन सध्या महाराष्ट्र बदनाम झालाय, जे व्हायला नको. महाराष्ट्राला देशात एक वेगळीच प्रतिष्ठा आहे. 

माझं कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश नव्हता. सरकारमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचं काम उत्तम सुरू आहे. फक्त, विरोधकांकडून जे वातावरण निर्माण केलं जातंय, ते करुन देण्याची संधी विरोधकांना देऊ नये, हेच मला सांगायचं होतं, असे रोखठोक स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय. तसेच, महाविकास आघाडी सरकार स्थिर असून पुढील साडेतीन वर्षे विरोधकांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत, असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला. 

शरद पवार अहमदाबादला होते, पण भेट नाही

राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि प्रफुल पटेल शुक्रवारी, २६ मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादेत आले. वस्तुत: हा विवाहसोहळा शनिवारी, २७ मार्च रोजी होता. परंतु अदानी परिवारातील आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले. पवार आणि पटेल दोघेही जण अहमदाबादेत असतानाच अमित शहा यांचेही शहरात आगमन झाले. मात्र, पवार आणि पटेल यांनी शहा यांची भेट घेतली नाही. या तिघांमध्ये भेट झाल्याची नुसतीच चर्चा रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.

ही निव्वळ अफवा : नवाब मलिकशरद पवार आणि अमित शहा यांच्यात कोणतीही भेट झालेली नाही. ही निव्वळ अफवा असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी स्पष्ट केले. यासंदर्भातील ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही. 

गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम रविवारी अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्याशी भेट झाली किंवा कसे, या प्रश्नावर थेट उत्तर न देता ‘राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात’, असे सूचक विधान करत संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावर मतप्रदर्शन करत भाजप तेथे प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला.  

योग्य वेळी सर्व  उघड होईलखुद्द शरद पवार यांनी या वृत्ताचे खंडन का नाही केले, असे विचारले असता ‘योग्य वेळी हे सर्व उघड होईल. पवार साहेबांची ती सवय नाही. ते योग्य वेळेची निवड स्वत:च करतात’, असे राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. 

हे तर केवळ कल्पनारंजन- उष्मा मल्लअहमदाबाद : शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतली, हे  केवळ कल्पनारंजन आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. पवार आणि  पटेल काही संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादला आले होते.  योगायोगाने अमित शहा हेही शहरात होते; परंतु त्यांची भेटच झाली नसल्याने बैठकीचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे या तिघांमध्ये बैठक झाली आणि त्यात सरकार बनविण्याची चर्चा झाली यात काही तथ्य नाही.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेससंजय राऊतशिवसेनाअनिल देशमुख