IIT Bombay: भारतातील सर्वात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कडक सुरक्षा ठिकाणांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेमध्ये विद्यार्थी असल्याचे भासवून एक अज्ञात तरुण १४ दिवसांपासून कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राहत होता. हा सगळा प्रकार समोर येताच मुंबई पोलिसांनी तरुणाला अटक केली. मात्र या घटनेमुळे आयआयटी मुंबईच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मंगळुरू येथील २२ वर्षीय बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला विद्यार्थी असल्याचे भासवून १४ दिवस कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राहत होता. सुरक्षा रक्षकांनी हटकल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बिलाल याला अटक करण्यात आली. १७ जून रोजी त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था असलेल्या आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी काम करणाऱ्या आयआयटी बॉम्बेमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
कर्नाटकातील मंगळुरू येथील २२ वर्षीय संशयित बिलाल अहमद फयाज अहमद तेली याला १७ जून रोजी कॅम्पस सिक्युरिटीने अटक केली आणि नंतर पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरक्षा दलाची नजर चुकवून तो संस्थेच्या कॅम्पसमध्ये कसा घुसला आणि तो रात्रभर कुठे राहिला याचा तपास सुरू आहे. हा तरुण काहीतरी कट रचत असल्याचा संशय आहे, त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाकडे संभाव्य धोका म्हणून पाहत आहेत. तो कोणावर पाळत ठेवण्याच्या, रेकी करण्याच्या प्रयत्न करत होता का हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो एखाद्या मोठ्या नेटवर्कचा भाग असण्याची किंवा एखाद्याच्या सूचनांनुसार काम करत असण्याची शक्यताही पोलिसांनी नाकारलेली नाही.
नेमकं काय घडलं?
आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने यासंदर्भात तक्रार दाखल केली. ४ जून रोजी जेव्हा सीआरईएसटी विभागाच्या अधिकारी शिल्पा कोटिक्कल यांनी एका संशयास्पद तरुणाला त्यांच्या कार्यालयात प्रवेश करताना पाहिले. चौकशी करून त्याचे ओळखपत्र मागितले असता, तो पळून गेला. कोटिक्कल यांनी नंतर सीसीटीव्ही फुटेजमधून संशयिताच्या चेहऱ्याचे फुटेज काढले आणि ते आयआयटीच्या क्यूआरटीसोबत शेअर केले. शोधानंतरही, तो तरुण सापडला नाही आणि तो कॅम्पसमध्ये लपून राहिला. १७ जून रोजी संध्याकाळी ४ वाजता, कोटिक्कल यांनी त्याला पुन्हा पाहिले. यावेळी तो लेक्चर हॉल एलएच १०१ मध्ये विद्यार्थ्यांमध्ये बसला होता. सुरक्षा रक्षक किशोर कुंभार आणि श्याम घोडविंदे यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, बिलाल तेलीने सांगितले की तो २ जून ते ७ जून आणि १० जून ते १७ जून पर्यंत अनेक वसतिगृहांमध्ये राहत होता. आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये सुमारे १३,००० विद्यार्थी राहतात. त्यानंतर पवई पोलिसांनी आयआयटी पवई कॅम्पसमधून आरोपीला ताब्यात घेतले आहे. बाहेरील व्यक्तीने कॅम्पसमध्ये दोन आठवडे राहणे, वसतिगृहांमध्ये प्रवेश करणे ही गंभीर बाब आहे. त्याची पार्श्वभूमी, हेतू आणि संपर्कांचा तपशीलवार तपास केला जात आहे, असं पोलिसांनी सांगितले.