Join us  

देवेंद्र फडणवीसांच्या प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे; भाजपाचे आमदार राहिलेल्या अनिल गोटेंचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:47 AM

फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे, असा निशाणा देखील अनिल गोटे यांनी साधला आहे.

मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे प्रत्येकाच्याच निशाणावर दिसत आहेत. एवढेच नाही, तर याच मुद्द्यावर देशाच्या संसदेतही जबरदस्त गदारोळ पाहायला मिळाला. 

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. मात्र याचदरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहे.  एकेकाळचे भाजपवासी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा लक्ष केले आहे. अनिल गोटे यांनी परिपत्रक काढून देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. (Senior NCP leader Anil Gote has leveled allegations against opposition leader Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीसांच्या आक्रस्ताळेपणाकडे दुर्लक्ष करा. सत्ता हिरावल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे.फडणवीस सरकारमधील मंत्री हे चिंचोके गोळा खात होते का? फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहे, अशी टीका अनिले गोटे यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाटलेल्या नोटा वर्षावर छापल्या होत्या का? फडणवीसांच्या दरबारातील नवरत्नांच्या यादीवरुन नुसती नजर फिरवली तरी सर्व लक्षात येईल. आपल्याकडे केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली, असं अनिल गोटे म्हणाले आहेत. फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे, असा निशाणा देखील अनिल गोटे यांनी साधला आहे.

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांचं समर्थन करून जनतेच्या रोषाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून त्यांचे आकांडतांडव सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून विरोधकांनाच नव्हे, तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसं वेठीला धरलं, अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे, असा दावा देखील अनिल गोटे यांनी केला आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअनिल गोटेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार