''ओठास लाली व तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी आता खिडकीही बंद करावी'' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 09:07 AM2019-12-21T09:07:02+5:302019-12-21T09:07:18+5:30

हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला होता.

sanjay raut criticize bjp and devendra fadnavis | ''ओठास लाली व तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी आता खिडकीही बंद करावी'' 

''ओठास लाली व तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी आता खिडकीही बंद करावी'' 

Next

मुंबईः हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांना काँग्रेसबरोबर जाण्याचा शब्द दिला होता का, असा प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उद्धव ठाकरेंनीही उत्तर देताना भाजपाची पालखी कायम वाहणार नसल्याचा बाळासाहेबांना शब्द दिल्याची आठवण करून दिली होती. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक रंगलेली पाहायला मिळाली. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामन्याच्या अग्रलेखातूनही भाजपाला याच मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात आलं आहे. 

2019मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. शिवसेनेने स्पष्टच केले. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले, असं म्हणत भाजपासोबत उरलंसुरलेलं नातंही संपुष्टात आणल्याचे सूतोवाच केले आहेत. 

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

- भारतीय जनता पक्षाचे 30 वर्षांचे ओझे उतरवले असल्याची शुभवार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! हा प्रयोग गेली 30 वर्षे चालला होता. 

- आता हे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने खिडकीत बसून 'शुक शुक' करणे बंद करावे.

शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे. नागपूरच्या अधिवेशनात काही मंडळींनी टोकाची वक्तव्ये केली. 

'आम्ही फार काळ विरोधी पक्षात बसणार नाही. पुढच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा सत्तेवर असू' अशी फेक विधाने करूनही नागपूरच्या थंडीत राजकीय हवा गरम झाली नाही. 

- भाजपचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले. 

- ओझे व ताण इतका उतरला की, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. खडसे यांना आता इतके मोकळे वाटू लागले आहे की, ते एकाच वेळी पवारांना भेटतात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. 

- माझा निर्णय घ्यायला मी मोकळा असल्याचे ते हिमतीने सांगतात. पंकजा मुंडे यांचीही भूमिका वेगळी नाही. प्रत्येकजण मनावरील ओझे फेकून देत आहे व मोकळा श्वास घेत आहे. 

- 'काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का?' असा प्रश्न विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. 

- फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यामुळे त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल. भाजप हे एक ओझे होते व राज्यातील तीन प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन भाजपचे ओझे उतरवले.

- काँग्रेस पक्षातून टनावारी माणसे फोडून आपल्या पक्षात घ्यायची व सत्ता मिळवायची हे ज्यांना चालते त्यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्री पद मिळवले वगैरे अशी विधाने करण्याच्या भानगडीत पडू नये. 

- भारतीय जनता पक्ष म्हणजे 'भारत जलाओ पार्टी' असल्याची बोंब ज्यांनी ठोकली ते रामविलास पासवान मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत व मोदी यांना खालच्या शब्दांत जोडे मारणारे नितीशकुमार हे बिहारात भाजपच्या टेकूवर मुख्यमंत्री आहेत. 

- त्यामुळे कोणी कोणावर बोलायचे? भारतीय जनता पक्षाचेच नेते देशाच्या प्रश्नांवर, जनतेच्या मागण्यांवर मूग गिळून बसले आहेत. पण भावनिक विषयांवर तोंड फाटेपर्यंत बोलत आहेत. 

- महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेस दगा दिला व हे दगानाट्य ठरल्याप्रमाणेच झाले. 2014 मध्ये खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा मोठ्या गर्वात केली. आज खडसे इतरांच्या पायऱ्या झिजवत आहेत.

Web Title: sanjay raut criticize bjp and devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.