काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालाय- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 14:50 IST2020-08-30T14:50:35+5:302020-08-30T14:50:56+5:30

मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते,

Sanjay Raut commenta on congress internal isuue | काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालाय- संजय राऊत

काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालाय- संजय राऊत

मुंबई- शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विषयावर भाष्य केलं आहे. सत्तेत असला तर सत्तेत, सत्तेत नसल्यास विरोधी पक्षात उभं राहिलं पाहिजे. दुर्दैवानं आज ती स्थिती दिसत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत, टीव्ही ९ मराठीकडे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष हा त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालेला दिसतोय. त्याची मलाही वेदना आहे. मी त्या विचाराचा नसलो तरी देशाच्या राजकारणात प्रमुख पक्ष टिकले पाहिजेत. तरच या देशाची संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकू शकते, असंसुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत.

मधल्या काळात २३ नेत्यांनी जे काही सोनिया गांधींना पत्र पाठवलं, त्यावरचा वाद अजून क्षमलेला नाही. त्यातून काँग्रेस पक्ष जास्त खिळखिळा होतोय की  काय, अशी मला भीती वाटतेय. त्या २३ नेत्यांची मागणी योग्य आहे. काँग्रेसला योग्य नेतृत्व मिळावं, यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाला गांधी  कुटुंबीयांशिवाय पर्याय नाही ही लोकभावना आहे. काँग्रेसचा अंतर्गत विषय देशाच्या राजकारणाशी संबंधित आहे.

काँग्रेस पक्षातून फुटूनच ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, शरद पवार, जगनमोहन रेड्डी यांनी स्वतःचे पक्ष तयार केले. त्यामुळे काँग्रेसचा सारखा पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात टिकला पाहिजे. समोर प्रबळ विरोधी पक्ष असल्यानंतर सत्ताधाऱ्यांना काम करण्याचा उत्साह येतो. राज्यात आमच्या समोर एक प्रबळ विरोधी पक्ष उभा आहे,  ज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले  आहेत.  
 

Web Title: Sanjay Raut commenta on congress internal isuue