मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दलित अत्याचाराच्या घटना घडत असूनही केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले गप्प आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली. ते सोमवारी मुंबईत काँग्रेसतर्फे करण्यात येणाऱ्या लाक्षणिक उपोषणाच्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, रामदास आठवले केंद्रात मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांबाबत मौन बाळगून आहेत. परिणामी दलित समाजाच्या मनात त्यांच्याविषयी रोष उत्त्पन्न झाला आहे. त्यामुळे आठवलेंनी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे, असे निरूपम यांनी म्हटले. दरम्यान, काँग्रेसच्या आजच्या लाक्षणिक उपोषणात पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील सहभागी होणार होते. ते सकाळी 10 वाजता ते राजघाटावर उपोषणाला बसतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, 12 वाजून गेल्यानंतरही ते राजघाटावर आलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.
मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांवर आठवलेंची 'चुप्पी'- संजय निरूपम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 12:36 IST