Join us  

सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय; मुख्यमंत्री ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 7:11 PM

CM Uddhav Thackeray On Sachin Vaze: सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय. हे चुकीचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही गुन्ह्यात आधी फाशी आणि नंतर तपास असं होऊ शकत नाही. सचिन वाझे हे जणू ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय. हे चुकीचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विविध प्रश्नांवर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली.  (CM Uddhav Thackeray Statement On Sachin Vaze and Mansukh Hiren Case)

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवायला हवा, असं म्हटलं. "राज्यात सध्या एखाद्याला टार्गेट करण्याची नवी पद्धत सुरू झालीय. एखाद्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच त्याच्यावर बेछुट आरोप करुन त्याला बदनाम करायचं हे योग्य नाही. मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर या दोन्ही प्रकरणांची सरकार अतिशय गंभीरपणे चौकशी करत आहे. तपास पूर्ण होऊ देत सारंकाही समोर येईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

फडणवीसांच्या बोलण्यावरुन लगेच निकाल द्यायचा का?विधानसभेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणी सीडीआर मिळवल्याबाबत आणि सभागृहात कागदपत्र सादर केल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य केलं. "देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्र सादर केली म्हणजे लगेच तिथल्या तिथं निकाल द्यायचा का? पोलिसांना तपास करू द्यायचा नाही का?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. फडणवीसांकडे काही कागदपत्र किंवा पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. त्यानुसार पोलीस तपास केला जाईल, असंही ठाकरे म्हणाले. 

'एकाला' अटक केली म्हणून वाझेंना लटकवायचं का?सचिन वाझे यांनी एकाला घरात जाऊन बेड्या ठोकल्या म्हणून त्यांना आता लटकवयाचं का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारलं. चौकशी पूर्ण होण्याआधीच फासावर लटकवलं जाऊ शकत नाही. मनसुख हिरेन प्रकरण असो किंवा मोहन डेलकर या दोन्ही प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. योग्यवेळी सर्व माहिती समोर येईलच, असंही ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :सचिन वाझेउद्धव ठाकरेमनसुख हिरणभाजपादेवेंद्र फडणवीसअजित पवार