तर आचार्य अत्रे म्हणाले असते, दहा हजार वर्षांत अशी मेट्रो झाली नाही!
By अतुल कुलकर्णी | Updated: May 28, 2025 06:18 IST2025-05-28T06:18:34+5:302025-05-28T06:18:42+5:30
पहिल्याच पावसाने अवघ्या महिन्याभराच्या आत नव्या मेट्रो स्टेशनचे पितळ उघडे पाडले.

तर आचार्य अत्रे म्हणाले असते, दहा हजार वर्षांत अशी मेट्रो झाली नाही!
अतुल कुलकर्णी
मुंबई : प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समारंभासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू येणार होते. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू होते. त्याचसंदर्भात आचार्य अत्रे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी सभेत बोलताना आचार्य अत्रे यांनी, ‘अन्यायाने संतप्त झालेल्या तीन कोटी जनतेला वाघनखे फुटतील आणि द्वैभाषिकाचा कोथळा बाहेर काढतील... दहा हजार वर्षांत असे आंदोलन झाले नसेल.’ असे विधान केले होते. पुढे प्रत्येकाने आचार्य अत्रे यांचे हे वाक्य आपापल्या सोयीने वापरले. ज्या आचार्य अत्रे यांच्या नावाने वरळीला भुयारी मेट्रो स्टेशन करण्यात आली त्याच मेट्रो स्टेशनमध्ये पाणी येऊ नये म्हणून बांधण्यात आलेली संरक्षक भिंत पडली. पहिल्याच पावसाने अवघ्या महिन्याभराच्या आत नव्या मेट्रो स्टेशनचे पितळ उघडे पाडले. जर आज आचार्य अत्रे असते तर त्यांनी, ‘दहा हजार वर्षात असे मेट्रोस्थानक झाले नाही आणि होणारही नाही...’ असे विधान केले असते.
मेट्रोस्थानकात पाणी शिरल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आत्ता कुठे एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महापालिका निवडणुका जशा जाहीर होतील तसे त्याची तीव्रता वाढत जाईल. आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन सुरू करण्याची एवढी घाई का केली गेली? हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे.
मार्च महिन्यात हे स्टेशन सुरू होईल असे सांगितले गेले. पुढे सतत तारीख पे तारीख सुरू होते. ९ मे रोजी या स्टेशनचे रीतसर उद्घाटन झाले. १० मे पासून हे स्टेशन प्रवाशांकरता खुले केले गेले. मात्र अवघ्या पंधरा दिवसात या भुयारी स्टेशनचा स्विमिंग पूल झाला. ॲक्वा स्टेशन हे नाव यंत्रणेने सार्थ करून दाखवले.
एमएमआरसीने केलेला खुलासा न पटणारा आहे.
मेट्रोचे म्हणणे
या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरूपी काम येत्या ३ महिन्यांत होईल).
तूर्तास पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू होते. हे पूर्ण काम १० जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पाऊस यामुळे ती पडली.
खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे.
उपस्थित प्रश्न
जर काम पूर्ण झालेले नव्हते तर हे स्टेशन सुरू करण्याची घाई कशासाठी केली गेली. यासाठी सीएमआरएस (कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी) यांनी परवानगी दिली होती का? जर दिली असेल तर त्यांच्या तपासणीवरच यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का?
उद्घाटन होण्याआधीच संरक्षक भिंत बांधून पूर्ण का झाली नाही, ही भिंत बांधली नसती तर होणारे धोके सीएमआरएसच्या किंवा एमएमआरसीच्या लक्षात आले नव्हते का? वरच्या बाजूला चालू असलेल्या कामाच्या दर्जाविषयी सतत बोलले जात होते. तेथेच मोठा खड्डा कसा पडला?
तात्पुरती वाहतूक थांबवली असली तरी यामुळे एमएमआरसीच्या कामावर देशभर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्याचे काय? या सगळ्या चुकांना अधिकारी जबाबदार की कंत्राटदार?
मूळ मेट्रो प्रोजेक्ट २१ हजार कोटींचा होता. जो आता ३७ हजार कोटींवर गेला आहे. कारशेडमुळे प्रकल्पाची किंमत वाढली असे सांगितले जात असले तरी, ती किंमत १६ हजार कोटींनी वाढली असे म्हणायचे का?
अभ्यास झाला होता का?
मुंबईत खडकाळ जमीन, गर्दीचा रस्ता, जमिनीखाली सेवा वाहिन्यांचे जाळे आहे. इथली लोकसंख्या पाहता स्टेशन मोठे करावे लागणार आहेत. वरळीचेच स्टेशन जमिनीखाली जवळपास पाच मजली आहे. याचा आधीच नीट अभ्यास झाला होता का? की प्रकल्प जसा जसा पुढे गेला तसा तसा त्यात बदल होत गेला? या प्रश्नांची उत्तरे देऊन या प्रकल्पावरचा गाढा विश्वास निर्माण करण्याचे काम एमएमआरसीला करावे लागेल.