‘बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावण महिन्याच्या आत मिळणार चाव्या’, आशिष शेलार यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:44 IST2025-05-29T18:44:43+5:302025-05-29T18:44:58+5:30
Ashish Shelar: बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आत दिल्या जातील असे म्हाडातर्फे आज जाहीर करण्यात आले. उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रहिवाशांसमोर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी ही माहिती दिली.

‘बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या श्रावण महिन्याच्या आत मिळणार चाव्या’, आशिष शेलार यांचं आश्वासन
मुंबई - बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आत दिल्या जातील असे म्हाडातर्फे आज जाहीर करण्यात आले. उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रहिवाशांसमोर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी ही माहिती दिली.
वरळी बीडिडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रहिवाशांची नव्या घरांचा उंच टॉवर उभा राहिला असून रहिवाशांचे काही प्रश्न व मागण्या होत्या म्हणून मंत्री आशिष शेलार यांनी आज बांधकाम सुरू असलेल्या टॉवरची पाहणी केली व रहिवाशांच्या अडचणी प्रश्न समजून घेतले. सुमारे दोन तास येथील रहिवाशांचे प्रश्न ऐकून घेतले. यावेळी मिलिंद बोरिकर यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.
रहिवाशांनी नव्या इमारतीला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे अशी विनंती केली त्यानुसार मंत्री आशिष शेलार यांनी म्हाडा आणि महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले की, नव्या इमारतींमधील रहिवाशांची संख्या विचारात घेऊन नवीन पाण्याच्या लाईन टाकून पाणी उपलब्ध करून द्या असे निर्देश दिले. तसेच पार्किंग टाँवरचे एक काम पुर्ण झालेले नाही त्यामुळे तात्पुरती स्वरुपात शेजारी असणाऱ्या जुन्या दोन इमारती पाडून पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी केल्या त्या म्हाडाने मान्य केल्या तसेच पार्किंग लाँटरी पध्दतीने दिले जाईल, असेही बोरिकर यांनी सांगितले.
दरम्यान, लवकरात लवकर चाव्या वाटप करावे अशी मागणी रहिवाशांनी केली त्यावर बोरिकर यांनी येत्या श्रावणाच्या आत चाव्या ताब्यात देण्यात येतील, पाईप गँस आणि सुविधा ही उपलब्ध करून दिल्या जातील असेही बोरिकर यांनी यावेळी सांगितले.