Join us

रेरा घेणार तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 18:19 IST

विकासकांच्या तातडीच्या विषयांवरील सुनावणी सुरू करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

 

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार १७ मे पर्यंत महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे  (महारेरा) कार्यालय बंद असले तरी मंगळवारपासून गृह खरेदीदार आणि विकासकांच्या तातडीच्या विषयांवरील सुनावणी सुरू करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. हे कामकाज आँनलाईन पद्धतीने होईल.

देशभरात लाँकडाऊन जाहीर झाल्यानंतर महारेराने आपले कामकाजही थांबविले होते. मात्र, लाँकडाऊनच्या काळात नव्या प्रकल्पांची नोंदणी, एजंट नोंदणी, नोंदणीकृत प्रकल्पांची मुदतवाढ, त्यात सुधारणा आदी कामे आँनलाईन पध्दतीने सुरू होती. ती यापुढेही सुरू राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. महारेराचे कर्मचारीसुध्दा डिजीटल पद्धतीने कामकाज करत असून त्यांना १७ मे पर्यंत तसेच काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गृहखरेदीदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी केवळ तातडीच्या प्रकरणाची दखल घेण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. त्याबाबतचे अर्ज केल्यानंतर विषय तातडीचा आहे की नाही हे ठरविण्याचे अधिकारी प्राधिकरणाच्या खंडपिठाकडे असतील. तातडीची प्रकरणे secy.maharera.mahaonline.gov.in यावर दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १८ तारखेपासूनच्या कामकाजाबाबतचा निर्णय त्यावेळी सरकारकडून येणा-या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतला जाईल असेही महारेराचे सचिव डाँ. वसंत प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :बांधकाम उद्योगमहाराष्ट्रमुंबईकोरोना वायरस बातम्या