मुंबईतील शेकडो मुलांचे अपहरण; राज ठाकरेंचा मोठा दावा, थेट आकडेवारीच मांडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 21:28 IST2026-03-19T21:27:15+5:302026-03-19T21:28:49+5:30
Raj Thackeray Gudi Padwa Melava : राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज पोहोचत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

मुंबईतील शेकडो मुलांचे अपहरण; राज ठाकरेंचा मोठा दावा, थेट आकडेवारीच मांडली
Raj Thackeray Gudi Padwa Melava : मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत राज्यातील कायदा-सुव्यवस्था, बेपत्ता मुले, ड्रग्जचा वाढता सुळसुळाट या प्रश्नांवर भाष्य केले. राज ठाकरे यांनी सांगितले की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे साडेचार हजार ते साडेपाच हजार मुले बेपत्ता होतात. या मुलांच्या पालकांवर काय बीतत असेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील आकडेवारी मांडत परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील ३६ दिवसांत मुंबईत ८२ मुले बेपत्ता झाली, तर जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नवी मुंबईत ४९९ अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरेंनी राज्यातील ड्रग्जच्या समस्येवरही चिंता व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्रात ड्रग्ज विकले जात आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्येही ड्रग्ज पोहोचत आहेत, असा आरोप करत त्यांनी तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याची खंत व्यक्त केली. ग्रामीण भागातील विकासाअभावी तरुण शहरांकडे स्थलांतर करत आहेत, मात्र शहरांची अवस्था बकाल झाल्याचे त्यांनी सांगितले. शहरांमध्ये वाढते गुन्हे आणि असुविधा याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
इन्स्टाग्राममधून बाहेर पडा...
यावेळी राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या वाढत्या वापरावरही भाष्य केले. ते म्हणाले, आपल्याला आज करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. आयपीएल, पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवले जाते. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा. तुम्ही गुंतवून राहिला तर सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हे सगळे आखले आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावे, मग कुणीही विचार करणार नाही. पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. या अशा विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकला आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.