रेल्वेने फेऱ्या वाढवल्या, पण प्रवाशांना परवानगी नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:21 IST2020-11-01T01:05:29+5:302020-11-01T06:21:39+5:30
Mumbai Local : मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण ७०६ फेऱ्या चालवल्या जात असून त्यामध्ये ३१४ तर पश्चिम रेल्वेमार्गावर ७०४ मध्ये आणखी २९६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

रेल्वेने फेऱ्या वाढवल्या, पण प्रवाशांना परवानगी नाहीच
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे. परंतु सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्व महिला यांना प्रवासाची मुभा आहे. सध्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर १४१० फेऱ्या सुरू असून त्यामध्ये ६१० फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्या असल्या तरी सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही.
मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण ७०६ फेऱ्या चालवल्या जात असून त्यामध्ये ३१४ तर पश्चिम रेल्वेमार्गावर ७०४ मध्ये आणखी २९६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या रेल्वेकडून मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण १४१० फेऱ्या चालविण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता १२ डब्यांच्या गाड्या चालवल्या जात असून सोशल डिस्टन्सिंगच्या पार्श्वभूमीवर १२०० प्रवासी क्षमतेपैकी केवळ ७०० जणांना प्रवासाची मुभा आहे. अंदाजे ९८०००० प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत.