अंधेरी पूल दुर्घटनेला रेल्वेच जबाबदार, रेल्वे सुरक्षा आयोगाचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 06:16 IST2018-07-19T06:15:55+5:302018-07-19T06:16:06+5:30

अंधेरी पूल दुर्घटना ही रेल्वे कर्मचारी आणि अन्य यंत्रणांच्या अपयशामुळे घडल्याचा निष्कर्ष रेल्वे सुरक्षा आयोगाने प्राथमिक चौकशीअंती काढला आहे.

Railways are responsible for the Andheri bridge accident, Railway Safety Commission's findings | अंधेरी पूल दुर्घटनेला रेल्वेच जबाबदार, रेल्वे सुरक्षा आयोगाचा निष्कर्ष

अंधेरी पूल दुर्घटनेला रेल्वेच जबाबदार, रेल्वे सुरक्षा आयोगाचा निष्कर्ष

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना ही रेल्वे कर्मचारी आणि अन्य यंत्रणांच्या अपयशामुळे घडल्याचा निष्कर्ष रेल्वे सुरक्षा आयोगाने प्राथमिक चौकशीअंती काढला आहे. याचबरोबर, अंधेरी पुलाच्या पादचारी भागात केबल आणि पेव्हरब्लॉकसाठी मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वेची परवानगी घेतली नव्हती. यामुळे याचा अतिरिक्त भार पुलावर आल्यामुळे पादचारी भाग कोसळल्याचे आयोगाने बुधवारी सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले.
दरम्यान, हा प्राथमिक अहवाल असल्यामुळे बुधवारी तरी कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. चौकशीचा अंतरिम अहवाल सुमारे ३ ते ४ महिन्यांनंतर येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. ३ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी अंधेरी
येथील गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला होता.
>‘तेव्हा’ रेल्वे कर्मचारी काय करत होते?
अंधेरी पुलाच्या पादचारी भागात सुमारे ६२ केबल्स टाकण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर, पादचारी पुलाच्या कामासाठी पेव्हरब्लॉक आणि वाळूचा वापर करण्यात आला होता. मुळात हे काम एका रात्रीत झालेले नाही. परिणामी, हे काम होत असताना रेल्वे कर्मचारी काय करत होते? असा सवाल उपस्थित होत आहे.
- समीर झव्हेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ता
>कामांसाठी रेल्वेची परवानगी नाही
रेल्वे सुरक्षा आयोगाचे आयुक्त सुशील चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राथमिक चौकशीतील अहवालानुसार, अंधेरी स्थानकावरील गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला. पुलाखालील ओव्हरहेड वायरमधून २५ किलोवॅट विद्युत प्रवाह जात आहे.
काँटिलिव्हर पद्धतीच्या या पेव्हर ब्लॉक, वाळू आणि अन्य केबल टाकण्यात आल्याने त्याचा भार पादचारी पुलावर आला. गोखले पुलावरील पादचारी पुलाचे काम करताना मुंबई महापालिकेने केबलसह पेव्हर ब्लॉक आणि वाळूच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेची कोणतीही परवानगी घेतली नाही. मूळ पुलाच्या उभारणीवेळी या अतिरिक्त वजनाचा विचार करण्यात आलेला नव्हता. परिणामी, रेल्वे कर्मचारी आणि अन्य घटकांच्या अपयशामुळे ही दुर्घटना घडली.

Web Title: Railways are responsible for the Andheri bridge accident, Railway Safety Commission's findings