ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 05:41 IST2020-08-08T05:41:20+5:302020-08-08T05:41:53+5:30

ग्रामीण भागात पूर्वी कोरोनाचे रुग्ण नव्हते, जूननंतर प्रवासाला परवानगी दिल्याने ग्रामीण भागात साथ वाढली आहे.

The prevalence of corona increased in rural areas | ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

अतुल कुलकर्णी

मुंबई : राज्यात मुंबई, औरंगाबादसह मोठ्या शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात येत असली तरी ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढत आहे. लोकांनी काळजी घेतली तर महिनाभरात साथ आटोक्यात येईल, असे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी लोकमतला सांगितले.

ग्रामीण भागात पूर्वी कोरोनाचे रुग्ण नव्हते, जूननंतर प्रवासाला परवानगी दिल्याने ग्रामीण भागात साथ वाढली आहे. सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील गावखेड्यात कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. लक्षणे नसलेले रुग्ण राजरोसपणे वावरत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येते. ज्यांनी प्रवास केला आहे, अथवा जे रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, अशांनी क्वारंटाईन व्हावे. तसेच स्थानिक प्रशासनाने आता संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा असे आदेश देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.
पुण्यातील रुग्णांचे आकडे जास्त सांगितले जातात, हा आरोप फेटाळून लावत टोपे यांनी सांगितले की, कोणीही आकडे कमी जास्त करायचे ठरवले तरीही तसे करता येत नाही, कारण वेगवेगळ्या यंत्रणा यात गुंतलेल्या आहेत.
१९०० रुपयांत चाचणी
कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले असून आता १९०० रुपयांत चाचणी होईल. यापूर्वी ४५०० रुपये लागत होते, ते दर काही दिवसापूर्वी २४०० रुपये करण्यात आले होते ते आणखी कमी केले आहेत, असे टोप यांनी सांगितले.

मी माय भगिनींना हात जोडून विनंती करतो, मास्क वापरा, स्वत:ची काळजी घ्या. गावात बाहेरचा कोणी आला तर त्याची सगळी तपासणी करुन घ्या, तरच तुम्ही सुरक्षीत रहाल.
- डॉ. तात्यराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

Web Title: The prevalence of corona increased in rural areas