Join us

निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा तो निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 12:44 IST

उद्धव ठाकरेंकडून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: पक्षाचे नाव आणि चिन्ह यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शुक्रवारी झाला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला.

यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वातील 'बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष व त्यांचे ढाल- तलवार हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष व त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह यांची मुदत केवळ चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे. 

मुंबईत हालचालींना वेग; उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलावली बैठक, आमदार, खासदार, पदाधिकारी रवाना

उद्धव ठाकरेंकडून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणं हे निवडणूक आयोगाचं काम नसल्याचे आंबेडकर म्हणाले. तसेच निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, येत्या २१ फेब्रुवारीपासून न्यायालयात नियमीत सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी मागणी आम्ही केली होती. तरी देखील निवडणूक आयोगाने हा निकाल दिलाय. न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल

निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक निर्णय आहे. देशाचे स्वातंत्र्य संपले आहे, आता आम्ही बेबंदशाहीली सुरुवात केली आहे, असे पंतप्रधानांनी लाल किल्यावरुन जाहीर करावे. हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. चोरांना राज्यमान्यता देणे त्यांना भूषणाव वाटत असेल, पण चोर हा चोरच असतो. आज मिंध्ये गटाची आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. 

रामाकडे धनुष्यबाण होता-

रामाकडे धनुष्यबाण होता आणि रावणाकडेही धनुष्यबाण होता. पण सत्याचाच विजय होणार. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, अंध धृतराष्ट्र नाही. हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, तिथे निकाल आमच्या बाजूने लागेल. धनुष्यबाण ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिकडं जल्लोष सुरू असेल. आपली चोरी पचली म्हणून चोर जल्लोष करत असतील. पण चोरी ही चोरीच असते. आम्ही लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार, तोपर्यंत यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनी खचू नका, मी खचलो नाहीये. ही लढाई शेवटपर्यंत आपल्याला लढावी लागेल. हिम्मत सोडू नका, विजय आपलाच होणार. मैदानात उतरलो आहोत, विजयाशिवाय परत यायचे नाही. यांनाना शिवसेनाप्रमुखांचा फोटो, नाव चोरावे लागत आहे. हे नामर्दांनो जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकरशिवसेनाभारतीय निवडणूक आयोग