प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:16 AM2021-11-15T10:16:54+5:302021-11-15T10:17:16+5:30

प्रदूषणाचा आघात इतका असतो की त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते आणि आयुष्य आणखी कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी ‘लोकमत’ला मुलाखतीत सांगितले.

Pollution shortens human life by an average of 10 to 15 years! | प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते !

प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते !

Next
ठळक मुद्देप्रदूषणाचा आघात इतका असतो की त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते आणि आयुष्य आणखी कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी ‘लोकमत’ला मुलाखतीत सांगितले.

सचिन लुंगसे

मुंबई : वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, शहर आणि ग्रामीण भागात परिणाम पाहायला मिळत आहे.  हे परिणाम किंचित फरकाने कमी अधिक असले तरी सारखेच असतात. यास राहणीमान आणि वातावरण हे दोन घटक कारणीभूत आहेत. आता शहरीकरण वेगाने होत असल्याने शहरात राहणेही दिमाखदार राहिले नाही तर गैरसोयीचे झाले आहे. प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी दहा ते पंधरा वर्षांनी कमी होते. मात्र, प्रदूषणाचा आघात इतका असतो की त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते आणि आयुष्य आणखी कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी ‘लोकमत’ला मुलाखतीत सांगितले.

प्रदूषण कोठून होते ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, म्हणून आपण उसाचे पाचट जाळता कामा नये. कारण हे पेटविल्यानंतर त्यातून राख तयार होते. कण तयार होतात. हे अतिशय हानिकारक असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा जास्त प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे पाचट जाळण्याऐवजी ते जमिनीत गाडून टाकले पाहिजे. धूळ हे सर्वत्र पसरलेले माध्यम आहे; ज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण असून, पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
शहरी आणि ग्रामीण वायू 

प्रदूषणाबाबत काय सांगाल ?
शहरी आणि ग्रामीण वायू प्रदूषणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ग्रामीण आणि शहरी भागात प्रदूषण वेगवेगळे असते. येथील प्रदूषके किंवा प्रदूषित कण वेगवेगळे असतात. शहरी भागात कमी जागेत प्रदूषण होते. येथे इंधन प्रदूषण अधिक असते. ग्रामीण भागात रस्ते कामे किंवा धुळीचे प्रदूषण जास्त प्रमाणावर असते. शेतीविषयक कामे, औद्योगिक कामे यातून धुळी प्रदूषण अधिक होते. आपल्या वातावरणात धुळीचे कण असतात. हे धुळीकण वातावरणात पसरतात. ते जड असल्याने वातावरणात खाली बसतात. याचा परिणाम मनुष्य प्राण्यावर होतो. त्याच्या फुफ्फुसाला इजा करतात.

प्रदूषण, कोरोनाचा संबंध आहे ?

प्रदूषण आणि कोरोनाचा संबंध तसा जोडता येणार नाही. ज्या प्रदूषणामुळे माणसाला त्रास होतो, त्यावर सुपरॲडेट कोरोनाचे इन्फेक्शन झाले तर मात्र रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो; असा एक थेट संबंध आहे. लॉकडाऊनच्या काळात वर्षभर जेव्हा हालचाली कमी झाल्या होत्या तेव्हा पर्यावरणाचे संवर्धन झाले आहे. आपण रोज जे व्यवहार करतो त्याला खीळ बसल्याने वातावरणातील प्रदूषण जास्त कमी झाले होते.

काय काळजी घेतली पाहिजे?

प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्तरावर काळजी घेणे गरजेचे आहे. लोकांना त्रास होणार नाही असा धूर, धूळ तयार होता कामा नये. किंवा आपण तो तयार करता कामा नये. पर्यावरणाचे संगोपन करण्याची सुरुवात ही प्रत्येक व्यक्तीपासून होते. त्यामुळे आपण स्वत: पर्यावरणाचा ऱ्हास करीत नाही ना याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. आपण, आपले कुटुंब आणि समाज असा विचार करीत आपल्या स्तरावर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खात्री बाळगली तर पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल.

Web Title: Pollution shortens human life by an average of 10 to 15 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.