गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये वाढले प्रदूषण; हवेचा दर्जा मध्यम, सुधारणा होणार कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:10 IST2026-01-22T14:09:54+5:302026-01-22T14:10:34+5:30
५०० मीटर अंतरावरचे दिसेनासे झाले होते. गगनचुंबी इमारतीही प्रदूषणात हरविल्या होत्या.

गेल्या २४ तासांत मुंबईमध्ये वाढले प्रदूषण; हवेचा दर्जा मध्यम, सुधारणा होणार कधी?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शहर आणि उपनगरांत बुधवारी ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १५० च्या आसपास नोंदविण्यात आला, तर हवेचा गुणवत्तेचा दर्जा मध्यम होता. हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईतील दृश्यमानता कमी झाली होती. ५०० ते हजार मीटर अंतरावरचे दिसत नव्हते. दक्षिण मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे गगनचुंबी इमारतीही प्रदूषणात हरविल्या होत्या.
तत्पूर्वी मंगळवारी शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक होता. २४ तास उलटताच हवेच्या गुणवत्तेत फरक नोंदविल्याने वाढते प्रदूषण मुंबईची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. हवामानातील बदलही प्रदूषणास कारणीभूत मानले जात असले तरी वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण व पालिकेकडून उपाय योजले जात आहेत.
दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान समस्या
पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वाऱ्याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्या प्रमाणात
वाढ होत असते.