Join us  

मंदिर खुली करण्यावरुन राजकारण तापलं, संजय राऊतांचा राज्यपालांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 2:35 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याची सूचना दिली आहे. तसेच, आपण हिंदुंचे कट्टर पुरस्कर्ते आहात, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शनही घेतले.

मुंबई - राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशात तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसेच, राज्यपाल हे घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरुन राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याची सूचना दिली आहे. तसेच, आपण हिंदुंचे कट्टर पुरस्कर्ते आहात, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शनही घेतले. आषाढी एकादशीला पंढरीला जाऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजाही केली. मात्र, राज्यात मंदिरे खुली करण्याबाबतची आपली भूमिका पाहिल्यानंतर आश्चर्य वाटते. आपण, अचानक सेक्युलर तर झाले नाहीत ना? असा सवालही कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना जशास तसे उत्तर दिलंय. 

देशात अचानक लॉकडाऊन लादणे योग्य नव्हते. त्यामुळेच, एकदम ते पूर्णपणे रद्द करणेही उचित ठरणार नाही, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीला एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुर्तास नकार दर्शवला आहे. त्यासोबतच, राज्यपालांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरही मुख्यमंत्र्यांनी जशात तसे उत्तर दिलंय. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरेंचं उत्तर हे ऐतिहासिक ठेवा असेल, असे म्हणत राज्यपाल कोश्यारी  हे सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.  

''राज्यपाल हे घटनात्मक पद असून, घटनेनुसार राज्य चालतंय का नाही, हे पाहणं त्यांचं काम आहे. ज्यांनी देशात हिंदुत्वाचा वणवा पेटवला, त्या शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे, आम्हाला हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही, आमचा आत्मा आणि मन हिंदुत्वाचं आहे. आजच, पतंप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलंय की, महाराष्ट्राला अद्यापही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे, जनतेची काळजी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्याबद्दल राज्यपालांनी त्यांचं कौतुक करायला हवं, असा सल्लाच संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींना दिलाय. भगतसिंग कोश्यारी यांनी सेक्युलर घटनेला अनुसरुनच राज्यपाल पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं उत्तर योग्य असून तो ऐतिहासिक ठेवा असेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हिंदुत्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?  मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.  

मंदिरं खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ

आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभगत सिंह कोश्यारीमुख्यमंत्रीउद्धव ठाकरे