Join us  

शिवसेना उभी राहिली शरद पवारांच्या पाठिशी; अमित शहांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी दिलं चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 7:51 AM

पक्ष बनतात आणि कमजोरदेखील होतात. पण कोणताच पक्ष कधीच कायमचा संपत नाही याचे भान राजकारणातील प्रत्येकाने ठेवायला हवे.

मुंबई - महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली आहे असं सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला आहे. सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना अमित शहा यांनी पवारांवर टीका करत 50 वर्षात त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. 

तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे अशा शब्दात शिवसेनेने रोहित पवारांचे कौतुकही केलं आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे  

  • पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एका फुटीतून उभा राहिला. त्यामुळे फुटलेलेच पुन्हा फुटले. जाडंभरडं पीठ दुसर्‍या पक्षात गेलं असे चिरंजीव रोहित म्हणतात. हे पीठ राष्ट्रवादीचे खरंच होते काय? सर्व पडझडीत प्रथमच एका पवारांचा तीर सुटला आहे. अर्थात या तीराने कोणी घायाळ झाले नाही, पण तीर सुटला हे महत्त्वाचे.  
  • विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात आयाराम गयारामांचे पीक जोरात आले आहे. गयाराम कसले? फक्त आयारामांचाच जोर आहे. 

  • आयारामांची रांग शिवसेनेतही लागली आहे. पण आमच्याकडे माणसं धुवून घेण्याचे वॉशिंग मशीन नसल्याने माणसं पारखूनच घ्यावी लागतात. काँग्रेस मृतवत होऊन पडली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इतकी भोके पडली आहेत की त्यांची चाळणी झाली आहे. 
  • 2014 प्रमाणेच 2019 च्या निवडणुकीतही शरद पवारांवरच हल्ले सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस किंवा पवारांचे राज्य महाराष्ट्रात नव्हते. राज्य आपले, म्हणजे ‘युती’चे होते. त्यामुळे पाच वर्षांत फडणवीस सरकारने केलेल्या कामांवर आपण सगळ्यांनीच  बोलायला हवे. 
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास अभूतपूर्व अशी गळती लागली आहे. ज्यांना पवारांनी वर्षानुवर्षे वतनदार्‍या आणि सुभेदार्‍या दिल्या ते सगळेच ‘उड्या’ मारून ‘गयाराम’ झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरील पवारांची मूठ ढिली पडल्याचे हे लक्षण आहे. 
  • पवारांनीही त्यांच्या हयातीत मोडतोड तांब्यापितळेचे राजकारण केले व त्यांनी शिवसेनेतूनही काही मासे जाळ्यात ओढले. आज त्यांच्या गोठय़ातील लोक दावण्या तोडून सैरावैरा पळत आहेत. हे सत्य  
  • पवार यांचा पक्ष आज साफ कोलमडला आहे व नितीन गडकरी यांच्या शब्दांत उंदीरमामांनी उड्या मारल्या आहेत. हे सर्व उंदीरमामा भ्रष्टाचारी होते व त्यांनी महाराष्ट्र कुरतडला होता, असा आक्षेप असला तरी हे ‘मामा’ आपापल्या भागातले वतनदार होते. 
  • या अनेकांच्या भ्रष्टाचाराचा पाढा मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह विधानसभेत मांडला व त्यातील काही जणांनी आता सरकार पक्षात प्रवेश करून महाराष्ट्राची नव्याने सेवा करायचे ठरवले आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत लोक राहायला तयार नाहीत व तेथील प्रवाह शिवसेना-भाजपकडे का वळत आहे? 
  • तिकडे निवडून येणे शक्य नसल्याने ते फायद्यासाठी पक्ष बदलत आहेत असे चंद्रकांतदादांनी सांगितले. प्रवाह आणि हवा बदलत असते. राजकारणात वार्‍यावरच्या वरातीही इकडे तिकडे जात असतात. 
  • पक्ष बनतात आणि कमजोरदेखील होतात. पण कोणताच पक्ष कधीच कायमचा संपत नाही याचे भान राजकारणातील प्रत्येकाने ठेवायला हवे.  
टॅग्स :नरेंद्र मोदीअमित शहाशरद पवारशिवसेना