Join us  

...अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, सुशांतच्या कुटुबीयांकडून राऊतांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:57 AM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे  खासदार संजय राऊत मैदानात उतरले. केवळ मैदानात उतरलेच नाहीतर तर राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोपही केले

मुंबई : सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरुन देशात चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. सुशांतच्या मृत्युप्रकरणात शिवसेना आणि भाजपा ऐकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात एक विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. आता, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे  खासदार संजय राऊत मैदानात उतरले. केवळ मैदानात उतरलेच नाहीतर तर राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोपही केले. सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. या आरोपामुळे भडकलेल्या सुशांतच्या कुटुंबाने संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू, असे नीरज म्हटले आहे. त्यानंतर, आता संजय राऊत यांना चुलत भावानं नोटीस पाठवली आहे. 'तुम्ही केलेल्या वक्तव्यांबद्दल ४८ तासांत माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा,' असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

'टाइम्स नाउ' या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळं आमच्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप करत सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू यानं नोटीस बजावली आहे. आपल्या 'वादग्रस्त वक्तव्यांबद्दल ४८ तासांत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा,' असा इशाराचा बबलू यानी खासदार संजय राऊत यांना दिलाय.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले होते. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक  एफआयआर  दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुस-या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला होता.

टॅग्स :सुशांत सिंगसंजय राऊतगुन्हेगारी