Join us  

'ये दिवार तुटती क्यूँ नही, अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 2:39 PM

सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शिबीर आयोजित करण्यात आले आहे,

मुंबई - ये दिवार तुटती क्यू नही... ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा... एसीसी... बिर्ला सिंमेटसे जो बनी है अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला टोला लगावला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलताना, अजित पवार यांनी भाजपावर टीका केली. तसेच, राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्या गयारामांनाही लक्ष्य केलं. 

मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं रणशिंग अजित पवार यांनी फुंकलं.  

सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शिबीर आयोजित करण्यात आले आहे, त्याबद्दल मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अजितदादा पवार यांनी यावेळी अभिनंदन केले. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय घेण्यात यावा असा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरु केली आहे. चुकीचे निर्णय आम्हाला वाटतात ते भाजपाला चांगले वाटतही असतील. ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत. आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत. ज्या कामांच्या बाबतीत शंका येते. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली, असेही पवार म्हणाले.

महाविकास आघाडी पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि महाविकास आघाडीत फूट पडण्याची आशा लागून असलेल्या भाजपालाही अजित पवार यांनी सुनावले. ये दिवार तुटती क्यू नही... ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा... एसीसी... बिर्ला सिंमेटसे जो बनी है अशा शब्दात, अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार टीकणारच असे, सुचवले. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामुंबई