Join us  

Mumbai Electricity: कंगनाचे पुन्हा टीकास्त्र, वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर शेअर केला राऊतांचा 'तो' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 12:45 PM

Mumbai Electricity: अभिनेत्री कंगना राणौत मुंबईतील समस्यांवर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची आणि सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. रविवारी कंगनाने आरेमधील मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याच्या निर्णयावर टीका केली होती.

मुंबई - मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रीड फेल झाल्यानं बत्ती गुल झाल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक लोकलदेखील थांबल्या आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानं अभिनेत्री कंगना राणौतपासून ते इतर दिग्दर्शक अशोक पंडित यांच्यासह अनेकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.  

अभिनेत्री कंगना राणौत मुंबईतील समस्यांवर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची आणि सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. रविवारी कंगनाने आरेमधील मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर, आज सकाळी मुंबईत झालेल्या अंधारावरुनही कंगनाने बीएमसी आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. कंगनासह दिग्दर्शक अशोक पंडित, कुणाल खेमू यांनीही चिमटा काढला आहे. तर, नेटीझन्सने ट्विटरवरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.  

कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचा फोटो शेअर केला आहे. मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार क..क..क.... कंगना करण्यात व्यस्त आहे, असे ट्विट कंगनाने केले आहे.

तर, दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही ''महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पॉवरलेस झाल्याची टीका केलीय. यासाठी ते आता रिपब्लिक आणि अर्नब गोस्वामीला दोष देणार नाही अशी अपेक्षा. मुंबईच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे कधीच वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. हे ग्रीड फेल्युअर म्हणजे सरकार प्रशासनामध्ये अपयशी ठरत असल्याचे हे उदाहरण आहे," असे पंडित यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन म्हटले आहे. 

नागरिक त्रस्त

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा १८ तारखेपर्यंत नाहीत. मात्र, महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्यानं लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. 

लोकल सेवाही ठप्प

महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांसोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही या पॉवर कटचा फटका बसला. कारण या बिघाडामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.  

टॅग्स :कंगना राणौतशिवसेनासंजय राऊतट्विटर