Join us  

तलावांमध्ये आता केवळ १५ टक्के जलसाठा शिल्लक; पावसाने दांडी मारल्यास पाणी टंचाईची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 8:10 PM

Mumbai Water News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता केवळ १५.५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

मुंबई - चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने त्यानंतर विश्रांतीच घेतली आहे. त्यामुळे मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता केवळ १५.५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आणखी दीड महिना पुरेल इतका हा जलसाठा आहे. परंतु, पावसाने अशीच दांडी मारल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईत महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटली होती. गतवर्षीच्या तुलनेत सध्या तलावांमध्ये ८० हजार दशलक्ष लिटर अधिक जलसाठा आहे.

मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या तलावांमध्ये सध्या एकूण दोन लाख २४ हजार ८९४ दशलक्ष लिटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात एक लाख ४४ हजार ७३० दशलक्ष लिटर साठा शिल्लक होता. तर २०१९ मध्ये या काळात पाणीप्रश्न पेटला होता. सध्या तलावांमध्ये असलेला जलसाठा जुलै अखेरीपर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकेल.

२४ जून २०२१ रोजी

जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये)

तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष)  सध्या

मोडक सागर १६३.१५   १४३. २६       ४९७३१  १५२.४८

तानसा    १२८.६३      ११८.८७      ३८५३९    १२२.१०

विहार    ८०.१२        ७३.९२        १७१९५.....७८.०७

तुळशी    १३९.१७        १३१.०७       ५९०१    ..१३७.५०

अप्पर वैतरणा ६०३.५१    ५९७.०२    ०००...५९२.६३

भातसा    १४२.०७        १०४.९०      ८५८६२ ...१११.३४

मध्य वैतरणा २८५.००    २२०.००      २७६६६..२४४.५७

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के

२०२१ -  २२४८९५...१५.५४

२०२० - १४४७३६....१०.००

२०१८- ७६००...०५.२७

 

टॅग्स :मुंबईपाऊसपाणी