Join us  

देशात १०९ मार्गांवर धावणार आता १५१ खाजगी ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 6:27 PM

खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वेचा प्रवास वेगात

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने १०९ मार्गावर १५१ आधुनिक ट्रेनद्वारे प्रवासी गाड्या चालविण्यासाठी खासगी कंपन्यांकडे अर्ज मागविला आहे. खासगी क्षेत्रातून सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. त्यामुळे खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वेचा प्रवास वेगात सुरू असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारद्वारे खासगी कंपन्यांना भारतीय रेल्वे नेटवर्कवर प्रवासी ट्रेन चालविण्याचे परवानगी देण्यात आली आहे. खासगी युनिट्सला आपल्या नेटवर्कवर प्रवासी गाड्या चालविण्याची योजना रेल्वेने बुधवारी औपचारिकरित्या सुरू केली. 

भारतीय रेल्वेच्या १०९ मार्गावर १५१ ट्रेन धावणार असून प्रत्येक ट्रेनमध्ये किमान १६ डबे असतील. या मार्गांवर धावणाऱ्या सर्व गाड्यांची ताशी वेग प्रति ताशी १६० किमी  असणार आहे. यापैकी बहुतांश आधुनिक ट्रेन्स ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात तयार केल्या जातील, असेही रेल्वेने म्हटले आहे. रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने देशातील पहिली खासगी ट्रेन लखनऊ ते दिल्ली तेजस एक्सप्रेस धावली. त्यानंतर देशभरात खासगी ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीने वेग धरला. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कमी खर्चात देखभाल करणे, भारतीय रेल्वेमध्ये कमी कालावधीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि नोकरीच्या संधीमध्ये वाढ करणे, उत्तम सुरक्षा आणि जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव घेणे हे खासगीकरणा मागील हेतू आहेत.रेल्वेची आर्थिक व्यवस्था, अधिग्रहण, ऑपरेशन आणि देखभाल याची जबाबदारी खासगी कंपन्याची असणार आहे. हा प्रकल्प खासगी कंपन्यांना ३५ वर्षांसाठी देणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. एका खासगी कंपनीला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे निश्चित शुल्क, वापरावरील उर्जा शुल्क आणि निश्चित महसूल यापैकी एक हिस्सा भारतीय रेल्वेला भरावा लागेल. तर, या सर्व ट्रेन्समध्ये चालक आणि गार्ड हे भारतीय रेल्वेचे असतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :रेल्वेभारतमहाराष्ट्रमुंबई