कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्वच पोलिसांना ५० लाख रुपयांचे साहाय्य मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 01:46 IST2020-09-27T01:45:47+5:302020-09-27T01:46:26+5:30

संडे अँकर। अनुदानासाठीच्या अटी, शर्थींमुळे पोलीस दलात अस्वस्थता

Not all policemen who die due to corona will get assistance of Rs 50 lakh | कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्वच पोलिसांना ५० लाख रुपयांचे साहाय्य मिळणार नाही

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्वच पोलिसांना ५० लाख रुपयांचे साहाय्य मिळणार नाही

खुशालचंद बाहेती ।

मुंबई : पोलीस हे देखील कोरोना योद्धे आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्यास ५० लक्ष रुपयांचे सानुग्रह साहाय्य कुटुंबियांना देण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र, या अनुदानासाठी सर्वच पोलीस पात्र नसून त्यांनी कोरोना प्रतिबंधक कर्तव्य केले असेल तरच त्यांना ते मिळणार आहे. अनुदानासाठीच्या अटी-शर्तींमुळे पोलिसांत अस्वस्थता आहे.

पोलिसांचे काम अशा पद्धतीचे आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळणे केवळ अशक्यच. त्यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे व त्यामुळे मृत्यू पावण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले. २९ मे २०२० रोजी तब्बल २ महिन्यांनंतर पोलिसांना कोरोना योद्धा असल्याचे मान्य करून कोरोनामुळे मृत्यू पावणाºया पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांचे सानुग्रह साहाय्य देण्याचे शासनाने जाहीर केले. पोलीस महासंचालक कार्यालयाने १८ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक जारी केले असून, यात कोरोनामुळे मृत्यू पावणाºया पोलिसांचे सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव २ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशात मयत पोलिसांना मृत्यूपूर्वी किंवा उपचारासाठी दवाखान्यात दाखल होण्यापूर्वी १४ दिवसांच्या कालावधीत कोविड-१९ प्रतिबंधकामी तैनात करण्यात आल्याच्या प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली आहे. या परिपत्रकामुळे पोलिसांच्या अनेक विभागांतील कर्मचारी अनुदानासाठी अपात्र ठरत असल्यामुळे पोलिसांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

कोविड-१९ मुळे मरण आल्यास सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी विशेष सानुग्रह साहाय्यासाठी (५० लक्ष रु.) पात्र असावेत. पोलीस महासंचालक आणि शासन तसा निर्णय घेतील आणि या अटी मागे घेतील, अशी अपेक्षा आहे.
-एम.एन. सिंह, निवृत्त पोलीस महासंचालक

पात्र ठरवा...
वस्तुत: पोलिसांना पोलीस ठाण्यात बंदोबस्तात वाहतूक नियंत्रण किंवा अन्य कामात दररोज अनेक अनोळखी लोकांना भेटावे लागते. त्यांना हाताळावे लागते. यामुळे त्यांना आजार झाल्यास तो शासकीय कर्तव्य पार पाडताना झालेली दुर्घटनाच ठरते. तरीही कोरोना प्रतिबंध कर्तव्यासाठी कर्तव्य केले असेल तरच अनुदानास पात्र ठरवणे असमर्थनीयच.
 

Web Title: Not all policemen who die due to corona will get assistance of Rs 50 lakh