Join us  

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 11:12 AM

मराठा संघटनेचे विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिल महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. या अधिवेशनात मनसे पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी नवीन भगवा झेंडा हाती घेणार असल्याचं कळतंय, मात्र या झेंड्यावरील राजमुद्रेच्या वापरावरून नवीन वादंग निर्माण झालं आहे. काही मराठा संघटनांनी शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करु नये अशी भूमिका घेतली आहे. 

यााबाबत मराठा संघटनेचे विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या राजमुद्रेचा वापर काही राजकीय पक्ष करु इच्छितात, राजमुद्रा एक वैशिष्ट आहे की, त्या राज्याची अधिकृततची झालर असते. राजमुद्रेचा वापर करणे म्हणजे गैरकृत्य आहे. एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका कोणत्या घटकाला पटली नाही तर त्या राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलन होतात, झेंड्याची जाळपोळ होते. निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते उत्साहाच्या भरात जमेल तिथे झेंडे लावतात नंतर ते झेंडे निवडणूक अधिकाऱ्यांकडून उतरुन डंम्पिंग ग्राऊंडला फेकतात असं त्यांनी सांगितलं आहे. 

MNS MahaAdhiveshan Live: मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण; शिवरायांची राजमुद्रा असणारा ध्वज

त्यामुळे शिवभक्तांना राजमुद्रा ही राजकारणासाठी डम्पिंग ग्राऊंड किंवा आंदोलनात अवमान होताना बघूच शकत नाही. उद्याचा वाद टाळण्यासाठी ज्याप्रकारे तामिळनाडू सरकारने १८ नोव्हेंबर १९५७ रोजी कायदा केला तशाप्रकारे राजमुद्रेचा समावेश The Prevention of Insult To National Honor 1971 यामध्ये करावा व केंद्राला शिफारस करावी अशी मागणी विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. 

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा 

दरम्यान, याबाबत विनोद पाटील यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. राजमुद्रा असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याला मान्यता देऊ नये असं पत्रात नमूद केलं आहे. मनसेच्या नवीन झेंड्यावरुन संभाजी ब्रिगेड यांनीही आक्षेप नोंदवला होता. राजमुद्रेचा वापर राजकीय फायद्यासाठी करु नका अन्यथा आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र मनसेकडून याला प्रत्युत्तर देण्यात आलं. गोरेगाव येथे झालेल्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेचा नवीन झेंड्याचं अनावरण केलं त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

 

टॅग्स :मनसेउद्धव ठाकरेहिंदूमराठानिवडणूक