Nawab Malik : 'भाजपा अन् राष्ट्रवादी ही नदीची दोन टोकं, एकत्र येणं अशक्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 18:27 IST2021-07-17T18:24:40+5:302021-07-17T18:27:14+5:30

Nawab Malik : नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो, तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य नाही.

Nawab Malik : Will BJP-NCP come together? NCP clarifies on Pawar-Modi meeting | Nawab Malik : 'भाजपा अन् राष्ट्रवादी ही नदीची दोन टोकं, एकत्र येणं अशक्य'

Nawab Malik : 'भाजपा अन् राष्ट्रवादी ही नदीची दोन टोकं, एकत्र येणं अशक्य'

ठळक मुद्देनदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो, तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य नाही.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून या भेटीबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मोदी-पवार यांच्या भेटीआधी केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंहदेखील पवार यांना भेटल्याचं राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींकडे शरद पवारांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. मोदींनी भेटीसाठी वेळ दिल्यानंतर आज दोन्ही नेते भेटले, असं मलिक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना या भेटीची कल्पना होती. काही दिवसांपूर्वीच शरद पवार मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेटले होते. याशिवाय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनादेखील पवार आणि मोदींच्या भेटीची कल्पना होती, असे मलिक यांनी सांगितलं.

नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो, तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही असा स्पष्ट खुलासाही मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या अटकली बांधल्या जात होत्या मात्र नवाब मलिक यांनी या अटकलींना पूर्णविराम आज दिला. राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद आणि भाजपचा राष्ट्रवाद यांच्यात जमीन आस्मानाचे अंतर आहे. शिवाय विचारसरणी वेगळी आहे असेही नवाब मलिक म्हणाले. 

बँकींग क्षेत्राबद्दल चर्चा

मोदी आणि पवार यांच्यामध्ये बँकिंग क्षेत्राबद्दल महत्त्वाची चर्चा झाली. बँक रजिस्ट्री कायद्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सहकारी बँकेच्या अधिकारांवर गदा आली आहे. बँकांचे अधिकार मर्यादित झाले आहेत. कायद्यात सुधारणा केल्यानंतर काही विसंगती आहेत. त्या गोष्टी शरद पवारांनी मोदींना सांगितल्या आणि लक्ष घालण्याचं आवाहन केलं. ही भेट अचानक झालेली नाही. भेट ठरलेली होती. या भेटीबद्दल संभ्रम  पसरवण्याचा प्रयत्न काहींकडून सुरू आहे, असं मलिक म्हणाले.

दोन मंत्री शरद पवारांना भेटले

मोदींची भेट घेण्याआधी दोन केंद्रीय मंत्री शरद पवारांना भेटले. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून निवड झाली आहे. त्यातच आथा पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांनी पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली. तर शरद पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट सिंह यांच्या दालनात झाली. त्यांनी यावेळी पवारांनी चिनी सैन्याकडून सुरू असलेल्या कारवायांची माहिती दिली. शरद पवार यांनी संरक्षण मंत्रिपद भूषवलं असल्यानं सिंह यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणेदेखील उपस्थित होते, अशी माहिती मलिक यांनी दिली.
 

Web Title: Nawab Malik : Will BJP-NCP come together? NCP clarifies on Pawar-Modi meeting