Join us  

Narendra Modi Punjab : नेहरुजी म्हटले नाहीत, माझ्या जीवाला धोका आहे, आव्हाडांनी सांगितली ती गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 10:01 PM

संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची डॉ.लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते, देश स्वातंत्र्य झाला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. मोदींनी या संदर्भात आज राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. पंजाब दौऱ्यात मोदींना 20 मिनिटे एका पुलावर थांबावे लागले होते. फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण, निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. त्यामुळे, पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न उभे राहिले आहेत. यावरुन, आता चांगलंच राजकारण तापत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरुंचे एक उदाहरण दिले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अनेकदा पंडित नेहरुंचे नाव घेण्यात येते. त्यावरुन, मोदींनी बहुतांशवेळा सोशल मीडियातून ट्रोलही केले जाते. आता, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या आयुष्यातील एक घटनाप्रसंग सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मी जिवंत पोहोचलो, हे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा. मोदींच्या या विधानाला अनुसरून आव्हाड यांनी हे उदाहरण दिलं आहे. 

काय म्हणाले होते मोदी

भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खोचक टीका करत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर निशाणा साधला. एअरपोर्टवर जिंवत पोहोचू शकलो याबाबत मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांग, असं पंतप्रधान मोदी विमानतळावरील अधिकाऱ्याला म्हणाले असल्याचं सांगण्यात येत आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना एक संदेश दिला. यात त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर निशाणा साधला.

संसदेच्या परिसरात एका महिलेने पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची डॉ.लोहिया यांच्या सांगण्यावरून कॉलर पकडून विचारले होते, देश स्वातंत्र्य झाला. मला काय मिळाले.? त्यावर नेहरूंनी हसत उत्तर दिले, पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचे स्वातंत्र्य. नेहरुजी हे म्हटले नाहीत, माझ्या जीवाला धोका आहे.... असा इतिहास सांगत आव्हाड यांनी मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींच्या सुरक्षेत झालेल्या गल्लतवरुन मोदींच्या जीवाला धोका असल्याचं भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यावर, आव्हाडांनी हा टोला लगावल्याचं दिसून येतं.  दरम्यान, एका उड्डाणपुलावर जवळपास १५ ते २० मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. तर, राष्ट्रपतींनीही याची दखल घेतली असून सर्वोच्च न्यायालयानेही रेकॉर्ड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. 

सहानुभूती मिळवण्याचा मार्ग - टीकैत

"जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक स्टंट आहे" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी "केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होतं" असं म्हटलं आहे. तसेच "अशाप्रकारची जी बातमी सुरू आहे की पंतप्रधान वाचले, सुखरूप परतले वैगेरे यावरून असं वाटतं की हा पूर्णपणे एक स्टंट आहे." 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडनरेंद्र मोदीपंजाबजवाहरलाल नेहरू