Join us  

महाविकास आघाडी कायमस्वरुपी नाही, केवळ ५ वर्षांसाठी; नाना पटोले यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 6:20 PM

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी आघाडी झालेली नाही.

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी झालेली नाही. राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. केवळ निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करणाऱ्याला अर्थ नाही. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीचं स्वबळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला हवं, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता मुख्यमंत्र्यांनी भाषणातून नेमका कुणाला सल्ला याची स्पष्टता झालेली नाही, असं म्हटलं आहे. 

काँग्रेससोबत भाजपनंही स्वबळाची नारा दिला आहे. याआधीही भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे यात काहीच गैर नाही, असंही ते म्हणाले. 

"महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची पाच वर्षांसाठी निर्मिती झाली. महाविकास आघाडी काही कायमस्वरुपासाठी झालेली नाही. पक्षाची ताकद वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे आणि कोरोना काळात जनतेला मदत करण्याला काँग्रेस पक्षानं नेहमीच प्राधान्य दिलं आहे. मग ते रक्तदान असो, ऑक्सिजन असो किंवा मग प्लाझ्मा कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी मदत केली आहे", असं नाना पटोले म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत केलेलं विधान हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून केलेलं आहे. प्रत्येक पक्षाला मोठं होण्याचा आणि पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, असंही नाना म्हणाले. 

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसउद्धव ठाकरे