Maharashtra Municipal Election Results 2026: महाराष्ट्राच्या किती महापालिकांत भाजपचा डंका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:08 IST2026-01-16T19:07:22+5:302026-01-16T19:08:17+5:30
Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने विरोधकांना धोबीपछाड देत दणदणीत यश मिळवले आहे.

Maharashtra Municipal Election Results 2026: महाराष्ट्राच्या किती महापालिकांत भाजपचा डंका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने विरोधकांना धोबीपछाड देत दणदणीत यश मिळवले आहे. या विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला हा कौल विकासाच्या राजकारणावर उमटवलेली मोहोर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येणार असल्याचा दावा फडणवीसांनी यावेळी केला आहे.
"आम्ही रेकॉर्ड तोडले!" – देवेंद्र फडणवीस
निकाल स्पष्ट होताच माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेला विजय हा ऐतिहासिक आहे. आपण विजयाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, २९ पैकी २५ महापालिकांमध्ये आमची सत्ता येत आहे. जनतेने आमच्या प्रामाणिकपणावर आणि विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवला आहे."
मुंबईतही महायुतीचा झेंडा फडकणार!
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालावरही फडणवीसांनी भाष्य केले. "मुंबईत मतमोजणीची प्रक्रिया काहीशी संथ असली, तरी सध्या जे कल हाती येत आहेत, त्यावरून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार हे निश्चित आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार यात आता कोणतीही शंका उरलेली नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत भाजप-शिंदे गट १२२ जागांवर आघाडीवर असून ठाकरे गट आणि मनसे युती ७२ जागांवर रेंगाळली आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा विजय
या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देताना मुख्यमंत्री म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी जो विकासाचा अजेंडा देशाला दिला आहे, तोच घेऊन आम्ही जनतेत गेलो होतो. लोकांनी या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. विरोधकांच्या आरोपांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिले असून, जनतेला भ्रष्टाचारापेक्षा प्रामाणिक काम हवे आहे, हे या निकालातून सिद्ध झाले आहे."
पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्येही भाजपने आपली पकड मजबूत केली असून, अनेक ठिकाणी भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. या निकालांमुळे विरोधकांसमोर मात्र मोठे आत्मपरीक्षण करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.