उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:35 IST2026-04-06T09:34:59+5:302026-04-06T09:35:35+5:30
पावसाला अजून बराच वेळ असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, गेल्या २३ दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठ्यामध्ये तब्बल १० टक्क्यांची घट झाली आहे. हा पाणीसाठा ४७ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत पाणी वितरणापासून पाणी गळतीपर्यंत विविध समस्यांमुळे मुंबईकर हैराण झाले असताना बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कालावधीत मुंबईचा पाणीसाठा ३३ टक्के इतका होता. पावसाला अजून बराच वेळ असल्याने मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व विहार या सात धरणातून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, उन्हाळ्यात मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढते. यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचा तडाखा बसत आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात मोठी घट होते. यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सातही धरणांमध्ये ५ लाख ४५ हजार ६८० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढणाऱ्या उकाड्याने पुढील दीड-दोन महिन्यांमध्ये पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
४ एप्रिल रोजीचा जलसाठा
- अप्पर वैतरणा ९१,६०९ ४०.३५
- मोडक सागर ४४,५३९ ३४.५५
- तानसा ४६,३८६ ३१.९७
- मध्य वैतरणा ७७,३३४ ३९.९६
- भातसा २,६६,२३४ ३७.१३
- विहार १६,०६५ ५८.००
- तुळशी ३,५१४ ४३.६७
- एकूण ५,४५,६८० ३७.७०
रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष
गृहनिर्माण संस्थांनी परिसरातील विहिरी व कूपनलिकांची नियमित देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता करून आवश्यक त्या जलशुद्धीकरण यंत्रणा बसवाव्यात. तसेच भूजलाचा उपसा नियमानुसार व मर्यादेत राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) ही अत्यंत महत्त्वाची उपाययोजना असून, सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरात अशी यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच यामुळे भूजल पातळी स्थिर राखण्यास मदत होईल तसेच दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी हा उपाय प्रभावी ठरेल, असे आवाहन महापौर तावडे यांनी केले आहे.