मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:34 IST2026-02-11T15:33:30+5:302026-02-11T15:34:25+5:30
महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारल्याचा केला पुनरुच्चार

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत महायुतीतील भाजपाच्या महापौर रितू तावडे आणि शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल."
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्जमुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे," असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.