मुंबई - हवामान खात्याला चकवा देत वेळेपूर्वीच राज्यासह मुंबईत मे महिन्याच्या शेवटी दाखल झालेला मान्सून त्यानंतर बेपत्ताच झाला होता. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. त्यानंतर पावसाने शुक्रवारी चांगला कमबॅक करीत मुंबईकरांना किंचित दिलासा दिला. त्यातही उपनगरांच्या तुलनेत शहरात अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने शनिवारी रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत बोरीवली, कांदिवलीसह कुर्ला, वांद्रे, घाटकोपर, सायनसह मुंबईत पावसाने चांगली हजेरी लावली. त्यानंतर मात्र, पावसाचे ढग आले असले तरी सायंकाळपर्यंत पावसाने चकवा दिला. पाच वाजण्याच्या दरम्यान वांद्रे, दादर, वरळी, महालक्ष्मी परिसरात पावसाने अर्ध्या तासांहून अधिक काळ हजेरी लावली. शनिवारी रविवारी पावसाचा जोर कमी राहणार असला तरी सोमवारपासून जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत पडलेला पाऊसवरळी ५० मलबार हिल ४३ पालघर ४२ दादर ३८ माटुंगा ३८ प्रभादेवी ३६ परेल ३४ धारावी ३१ बीकेसी ३० कुर्ला २८ सायन २८ ग्रँटरोड २ ३ वांद्रे २३ वडाळा २३ घाटकोपर २० पवई १८ बोरीवली १८ दहिसर १५